नागपूर – विदर्भात जोरदार पाऊस आणि धरणाच्या पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे नागपूर, भंडारा, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या 175 गावांमधल्या 53 हजारापेक्षा जास्त लोकांना सुरक्षित स्थळी हलवावे लागले आहे. गेल्या काही दिवसात या चार जिल्ह्यांमधे जोरदार पाऊस आणि पूरस्थितीमुळे 92 हजारापेक्षा जास्त लोकांना फटका बसला आहे.
राष्ट्रीय आपत्ती निवारण दल, राज्य आपत्ती निवारण दल आणि लष्करासह 11 बचाव आणि मदत पथके या भागात, विशेषतः चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यात कार्यरत आहेत. आज दुपारपर्यंत नागपूर विभागातल्या 53 हजार 224 लोकांना सुरक्षित स्थळी हलवल्याचे नागपूरच्या विभागीय आयुक्तालयाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटले आहे. भंडारा जिल्ह्यातल्या 76, नागपूर 61, चंद्रपूर 22, तर गडचिरोली जिल्ह्यातल्या 16 गावांना पुराचा फटका बसला असल्याचे या अहवालात म्हटले आहे.
नगरविकास मंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी भामरागड तालुक्याला भेट देऊन आठवडाभरापूर्वी तिथे उद्भवलेल्या पूर परिस्थितीची पाहणी केली. त्यांनी पूरग्रस्त नागरिकांना रेशन, कपडे आणि इतर जीवनावश्यक साहित्याचे वाटप केले. त्यानंतर शिंदे यांनी हेमलकसा येथील लोकबिरादरी प्रकल्पाला भेट दिली.
चंद्रपूर जिल्ह्यातल्या पोंभुर्णा तालुक्यात तसेच ब्रम्हपुरी तालुक्यातल्या लाडज गावात मदत आणि बचाव कार्यासाठी लष्कराच्या दोन तुकड्या तैनात केल्या आहेत. त्याठिकाणी आता पाणी ओसरायला सुरुवात झाली आहे, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाधिकाऱ्यांनी सांगितले.
गडचिरोली जिल्ह्यात गोसेखुर्द धरणातून रविवारी सर्वाधिक 30 हजार 117 क्युमेक पाणी सोडले होते. त्यामुळे पूरस्थिती निर्माण झाली. कालपासून धरणातून पाण्याचा विसर्ग कमी होतो आहे. आज गोसेखुर्द धरणातून फक्त 5 हजार 743 क्युमेक पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नद्या-नाल्यांचा पूर ओसरु लागला आहे. रस्त्यावरचे पाणीही कमी होत आहे. आज आरमोरी-ब्रम्ह्मपुरी आणि गडचिरोली-चंद्रपूर हे मार्ग सुरू झाले. मात्र गडचिरोली-आरमोरी आणि इतर मार्ग अजूनही बंदच आहेत. काल पहाटेपासून महसूल आणि पोलीस प्रशासनाने मच्छिमारांच्या मदतीने 137 जणांना पुरातून सुखरूप बाहेर काढले आहे.
भंडारा जिल्ह्यात पुरात अडकलेल्यांचा बचाव आणि शोध घेण्याचे काम सुरू असून राष्ट्रीय आणि राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या मदतीने जिल्ह्यातल्या 4 हजार 200 कुटुंबाना तात्पुरत्या शिबीरात हलवले आहे. पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावेत, नागरिकांना आरोग्यसेवा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करून भविष्यात अशी आपत्ती उद्भवणार नाही यासाठीच नियोजन करावे, असे निर्देश जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी दिले आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात जायकवाडी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरु असल्याने जायकवाडी धरण 92 टक्के भरले आहे.