चंद्रपूर- चंद्रपूर जिल्ह्यातील कोरोना बाधितांची संख्या गेल्या दोन दिवसात 110 वर पोहोचली आहे. ब्रह्मपुरीत एकाच दिवशी आज आठ बाधित पुढे आले. दरम्यान अधिक उद्रेक असणाऱ्या ब्रह्मपुरी तालुक्याचा दौरा जिल्हाधिकारी डॉ.कुणाल खेमनार यांनी गुरुवारी केला. त्यानंतर आज त्यांनी जिल्ह्यातील सर्व यंत्रणेशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला. ग्रामीण भागात मास्क वापर अनिवार्य करण्यात यावा, तसेच बाहेरून येणाऱ्यांना संस्थात्मक अलगीकरण करण्यात यावे, असे निर्देश त्यांनी दिले आहेत.
सोबतच ब्रह्मपुरी शहरात 14 जुलैपर्यंत लॉकडाऊन वाढवला आहे. शहरात फक्त जीवनावश्यक वस्तूंची दुकाने व शेतीसंदर्भातील दुकाने सकाळी 9 ते दुपारी 1 वाजेपर्यंत सुरू राहतील.रविवारी दुकाने पुर्नत: बंद असतील.
जिल्ह्यात गुरुवारी रात्री पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 102 झाली होती. त्यामध्ये शुक्रवारी सायंकाळी भर पडली असून ब्रह्मपुरी तालुक्यातून एकूण 8 पॉझिटिव्ह रुग्ण पुढे आले आहेत. त्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील आत्तापर्यंतच्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 110 झाली आहे.
जिल्हा आरोग्य यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार आता जिल्ह्यामध्ये उपचार घेत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांची संख्या 54 आहे. तर आतापर्यंत कोरोना मधून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 56 आहे.
आज प्राप्त झालेल्या माहितीनुसार ब्रह्मपुरी शहरातील दोन रुग्णांचा यामध्ये समावेश आहे. भवानी वार्ड येथील 27 वर्षीय पुरुष व 23 वर्षीय महिलेचा समावेश आहे.अन्य दोन रुग्ण गांगलवाडीचे असून यामध्ये 49 वर्षे पुरुष व 37 वर्षीय महिलेचा समावेश आहे.
ब्रह्मपुरी तालुक्यातील वांद्रा येथील 30 वर्षीय पुरुष व 25 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तालुक्यातील निलज या गावातून देखील तीन वर्षीय बालिका पॉझिटिव्ह ठरली आहे.तर चौगान येथील 32 वर्षीय पुरुषाचा यामध्ये समावेश आहे.
आजच्या 8 बाधितांपैकी 2 बाधित हे अनुक्रमे मुंबई आणि हैदराबाद येथून आले आहे. तर अन्य 6 बाधित जोखमीच्या संपर्कातील आहे. सर्व बाधितांची प्रकृती स्थिर आहे.
तत्पुर्वी, गुरुवारी रात्री चार पॉझिटिव्ह आढळले होते. जिल्हा आरोग्य यंत्रणेने रात्री उशीरा दिलेल्या माहितीनुसार चारही बाधित गृह व संस्थात्मक अलगीकरणातील आहे.
चार नव्या बाधितामध्ये वरोरा येथील कासम पंजा वार्डमधील संपर्कातील 34 वर्षीय व्यक्तीचा सहभाग आहे. तर चंद्रपूर शहरातील ऊर्जानगर भागातील नवी दिल्ली येथून आलेला 33 वर्षीय पुरुष, तुकुम भागातील सिकंदराबाद येथून आलेल्या 21 वर्षीय महिलेचा समावेश आहे. ऊर्जानगर व तुकूम परिसरातील दोन्ही बाधित संस्थात्मक अलगीकरणात होते. तर चौथा बाधित गडचांदूर येथील एसीसी कॉलनीतील रहिवासी आहे. हा 24 वर्षीय व्यक्ती दिल्लीवरून कोरपना तालुक्यातीत गडचांदूर अवालपूर येथे आल्यानंतर गृह अलगीकरणात होता. 1 जुलैला चारही नागरिकांचे स्वॅब घेण्यात आले. गुरुवारी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. चारही बाधितांची प्रकृती स्थिर आहे.