पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांच्यात शाब्दिक चकमक रंगल्याचं पाहायला मिळतंय. काल राऊत यांनी, पाटील यांच्यावर निशाणा साधताना कोथरूड विधानसभा मतदारसंघाचा पुढील आमदार हा शिवसेनेचा व ‘स्थानिक’ असेल असं वक्तव्य केलं होत. त्यांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पलटवार करताना, ‘भाजपवर टीका करणे हे संजय राऊत यांचे काम आहे. त्यांचं पक्षामध्ये जे स्थान आहे ते यामुळेच आहे’ असा टोला लगावला होता.
अशातच आता चंद्रकांत पाटलांनी राऊत यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. बोपोडी येथील एका कार्यक्रमामध्ये पत्रकारांशी बोलताना पाटील यांनी, ‘जगभरातील १८२ देशांचे राष्ट्रप्रमुख संजय राऊत आहेत. एवढ्या वर्षानंतर या जगामध्ये संजय राऊतांसारखे व्यक्तिमत्व निर्माण झाले असून त्यांच्याकडे फक्त भारतातल्या, महाराष्ट्रातल्याच नव्हे तर संपूर्ण जगातल्या विषयावर मत आहे. त्यामुळे त्यांच्याविषयी मी काय बोलणार?’ अशी खोचक टीका केली आहे.
बेळगावबाबत भूमिका मांडली
यावेळी बोलताना चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव येथील गावांचा महाराष्ट्रामध्ये समावेश करण्याबाबतच्या प्रश्नावर त्यांनी भूमिका मांडली. ‘तेथील अनेक गावात कन्नड भाषिक अधिक आहेत. ती गावं स्वाभाविकपणे कर्नाटकमध्ये गेली आहेत. अशी ८०० गावं आहेत. त्यामुळे बेळगावसहित ८०० गावं महाराष्ट्रात आली पाहिजेत. ही भारतीय जनता पार्टीची भूमिका आहे.’ असं ते म्हणाले.