पुणे – भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज महविकास आघाडी सरकारला खुलं आव्हान देताना, ‘हिंमत असेल तर शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने वेगवेगळं लढा’ असं वक्तव्य केलंय. पुण्यात पत्रकारांशी संवाद साधताना पाटील यांनी हे आव्हान दिलंय.
महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या वेगवेगळ्या विचारधारांवरून निशाणा साधताना, “तुमच्यात हिंमत नाही. कशाचा कशाला पत्ता नाही. झेंडा वेगळा, तत्व वेगळी आणि एकत्र लढता. आम्हाला काही फरक पडत नाही,” असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे राज्य चालवत नाहीत
शिवसेनेचे प्रमुख प्रवक्ते संजय राऊत यांनी आज पुण्यामध्ये पत्रकारांशी संवाद साधताना, “शरद पवारांचा सल्ला घेतला म्हणून कोणाच्या पोटात दुखण्याच कारण नाही. शरद पवार यांचा सल्ला देशातील अनेक नेते घेतात आणि ते आपल्या राज्यातील वरिष्ठ नेते आहे. जर त्यांचा आपण सल्ला घेतला नाही. तर आपल्यासारखे आपणच करंटे” असं वक्तव्य केलं होत.
राऊतांच्या याच वक्तव्याचा धागा पकडत चंद्रकांत पाटील यांनी, “शरद पवारांचा सल्ला घेतात ही आनंदाची गोष्ट आहे. शरद पवार महाराष्ट्र चालवतात, उद्धव ठाकरे नाही हे त्यांनी मान्यच केलं आहे. आता ते पवारांचा सल्ला घेऊ देत किंवा पार्थ पवारांचा घेऊ देत” असा टोला लगावला.”
दरम्यान, शिवसेनेचे मुख्य प्रवक्ते संजय राऊत यांनी भाजपवर केलेल्या टीकेबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील यांनी या प्रश्नाला उत्तर देणे टाळत, “भाजपवर टीका करणे हेच त्यांचे कर्तव्य आहे. त्यांचे पक्षातील स्थान यामुळेच तर आहे. त्यात काही विशेष नाही.” असं वक्तव्य केलं.