मुंबई – कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातील गावांबाबत वक्तव्य केल्यानंतर आता सीमाप्रश्नाने पुन्हा एकदा तोंड वर काढले आहे. यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापू लागले आहे. अशात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी थेट सरकारवर हल्लबोल करत सीमा प्रश्नांसाठी आक्रमक भूमिका मांडली आहे. स्वाभिमानासाठी शिवसेनेतून बाहेर पडलेल्या नेत्यांचा स्वाभिमान आता कुठे आहे ? कुठं शेण खातोय तुमचा स्वाभिमान ? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.
प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी सीमा प्रश्नी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला. एक राज्य आमचे उद्योग नेण्याचा प्रयत्न करतंय तर दुसरं राज्य आमची गाव घेण्याचा प्रयत्न करतय. मंत्री सीमाभागात जात नाहीत. किती मंत्री सीमाभागात गेले ? चंद्रकांत पाटील जातात आणि कन्नडमध्ये राष्ट्रगीत म्हणतात, कर्नाटकाच कौतुक करतात हा आमच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रकार आहे. असा टोला देखील संजय राऊत यांनी यावेळी लगावला.
आम्ही जाऊ आणि सीमाप्रश्नासाठी लढू असा इशारा देखील यावेळी संजय राऊत यांनी दिला.महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा एकदा उफाळून आल्यानंतर कर्नाटकाच्या मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी बोलत महाराष्ट्रातील जत तालुक्यातील अनेक गाव त्यांच्याकडे येण्यासाठी तयार असल्याचं खळबळजनक विधान केलं होते. त्यावरून आता ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत शिंदे फडणवीस सरकारवर हल्लाबोल केला.