जळोची – चंद्रकांत पाटील यांनी अमित शहांचे ट्विट नीट वाचावे, असा टोला आमदार रोहित पवार यांनी माजी मंत्री पाटील यांना लगावला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच तिन्ही कृषी विधेयक रद्द करण्याची घोषणा केली. यावर मात्र भाजपाचे चंद्रकांत पाटील यांनी कृषी कायद्यावर पुनर्विचार व्हावा, अशी प्रतिक्रिया दिली होती. यावर राष्ट्रवादीचे कर्जत जामखेडचे आमदार पवार यांनी चिमटा काढला.
पवार म्हणाले की, कृषी विधेयक मंजुरीनंतर केंद्रातील नेत्यांनी राज्यातील भाजप नेत्यांना कृषी कायद्याच्या बाजूने जनजागृती करण्याची जबाबदारी दिली होती. त्यावेळी शेतकऱ्यांचे हित लक्षात न घेता पक्षाचे हित पाहिले गेले. मात्र, शेतकऱ्यांच्या आंदोलनापुढे केंद्राला झुकावे लागले. पंतप्रधानांनी तीनही कृषी कायदे रद्द केले. यावर मोदी हे प्रत्येक भारतीयाच्या कल्याणाशिवाय आणखी कोणतेही विचार ते करत नाहीत, हेच यातून दिसतंय. त्यांनी उत्कृष्ट राजकीय कौशल्य दाखवले आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी समाजमाध्यमाद्वारे ट्विट केले होते. हाच धागा पकडून आमदार पवार यांनी चंद्रकांत पाटील यांनी अमित शहा यांनी केलेले ट्विट नीट वाचावं. त्यांनी जर सांगितले असेल हा शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय आहे. तर तो स्वीकारून राज्यात अशा प्रकारचे राजकारण न करता शेतकऱ्यांच्या बाजूने खंबीरपणे उभं राहावे, असा टोला पवार यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला.
एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत पवार म्हणाले की, एसटीच्या संपावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे. बहुतांशी मागण्या मान्य केल्या आहेत. सरकार एसटी कर्मचाऱ्यांबाबत संवेदनशील आहे. एसटी सेवा सर्वसामान्य लोकांसाठी आहे. त्यांना अनेक दिवसांपासून सेवेला मुकावे लागत आहे. आंदोलनात राजकारण घुसत असेल तर एसटी कामगारांनी विचार करावा. लवकरच एसटी कर्मचारी आणि सरकार चांगला निर्णय घेतील. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.