कोल्हापूर – भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे राज्यातील सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न सुरुच आहेत. परंतु ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांच्याबद्दल पाटील यांनी केलेले दर्पोक्तीयुक्त वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
ते पुढे म्हणाले, जणूकाही जामीन कोर्टातून रद्द करणार, अशा आविर्भावात चंद्रकात पाटील वक्तव्य करत होते. भुजबळ साहेबांनी संपूर्ण हयात राजकारण आणि समाजकारणात काढली आहे. त्यांच्याबद्दल असे वक्तव्य करण्याऱ्या चंद्रकांत पाटील यांनी माफी मागावी, अशी मागणी ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केली आहे.
दरम्यान, छगन भुजबळांनी पश्चिम बंगालच्या निकालावरुन भाजपवर टीका केली होती. मंत्री छगन भुजबळ म्हणाले होते की, ममता बॅनर्जी झाशीच्या राणी प्रमाणे लढल्या. मै अपना बंगाल नहीं दुंगी अशी प्रतिज्ञा ममता यांनी केली होती. मोदी, अमित शाह यांच्या एक दिवसआड सभा होत होत्या. 8 ते 10 मंत्री ठाण मांडून बसले होते पण उपयोग झाला नाही. आसाम वगळता भाजपला कुठेच साथ नाही.
त्यानंतर, संतापलेल्या चंद्रकांत पाटलांनी छगन भुजबळ यांना धमकीवजा इशारा दिला होता, ते म्हणाले होते की, “छगन भुजबळांनी पंढरपूरवर प्रतिक्रिया द्यावी, जामिनावर सुटलेला आहात, तुम्ही निर्दोष सुटलेले नाहीत. त्यामुळं तुम्ही फार जोरात बोलू नका अन्यथा फार महागात पडेल. अशी धमकी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली होती.