कोल्हापूर – राज्य सरकारने केलेल्या फसव्या कर्जमाफीच्या विरोधात भाजपनं कोल्हापुरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत विराट मोर्चा काढला आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा धडक मोर्चा कोल्हापूरच्या दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आला आहे.
महाविकासआघाडी सरकारने केलेल्या कर्जमाफीतील जाचक अटी-शर्ती रद्द व्हाव्या आणि शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी व्हावी या प्रमुख मागणीसाठी भाजपनं हजारो शेतकऱ्यांच्या समवेत आज जिल्हाधिकारी कार्यालयावर जोरदार धडक मोर्चा काढला. यावेळी कार्यकर्त्यांनी विविध फलक हातात घेऊन सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे उपाध्यक्ष धनंजय महाडिक, जिल्हाध्यक्ष समरजित सिंह घाडगे हे सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यासाठी आघाडी वरती होते.
सरकारने केलेली कर्जमाफी ही फसवी असून सरसकट कर्जमाफी करा, असा इशारा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी यावेळी दिला आहे. तसंच कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील आणि ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना देखील टोला लगावला आहे.