मुंबई – भाजपला रात्रीच बदल घडवण्याची सवय लागली आहे. त्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील 32 तारखेची वाट बघू लागले आहेत. 32 तारीख कधी येईल? कधी त्यांची पाहाट उजाडेल, कधी त्यांना त्या पाहाटेचा सुर्य दिसेल?, असे सवाल करत शिवसेना नेते आणि कृषी राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी टोला लगावला आहे. सत्तार यांनी एका वािंहनीला दिलेल्या मुलाखतीत भाजपवर निशाणा साधला.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत बोलताना एखाद्या पाहाटे काहीही घडू शकतं, असं विधान केलं आहे. त्यांच्या या विधानाबाबत अब्दुल सत्तार यांना विचारलं असता त्यांनी भाजपवर टीकास्त्र सोडलं.
भाजपचा रात्रीचा खेळ लोकांमध्ये संभ्रम निर्माण करणारा आहे. पण मुंगेरीलाल के सपने कभी पुरे नही होते. ते स्वप्न फक्त स्वप्नच राहतात. माझी चंद्रकांत दादांना विनंती आहे की, कमीत कमी लोकांची दिशाभूल करु नका, असं आवाहन अब्दुल सत्तार यांनी केलं.
देशामध्ये मोजके जे मुख्यमंत्री आहेत त्यामध्ये संयमी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांचं नाव आहे. त्यांचं नाव देशभर घेतलं जात आहे. मग त्यांचं राज्यात नाव घ्यायला काय हरकत आहे? महाराष्ट्राचे मुख्यमंत्री संयमी आहेत, असे केंद्रातील अनेक मंत्री म्हणतात, असं सत्तार म्हणाले.
या संकट काळात नियोजनबद्ध राज्य चालवण्याचं काम उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात आणि महाविकास आघाडीचे नेते करत आहेत. महाविकास आघाडीचे नेते ज्यापद्धतीने काम करत आहेत ते पाहून पुढचे पाच वर्ष चंद्रकांत पाटील यांचे अशाप्रकारचे स्वप्न ऐकायला मिळेल, असा चिमटा अब्दुल सत्तार यांनी काढला.