नवी दिल्ली : महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारला आज दोन वर्ष पूर्ण होत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर राज्यातून सरकारच्या कामगिरीचे सत्ताधारी नेत्यांकडून कौतुक होत आहे. तर दुसरीकडे आताभाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर दिल्लीतील नाराज असल्याची माहिती समोर आली आहे.राज्यातील ठाकरे सरकारला या दोन वर्षात चोख प्रत्युत्तर देण्यात पाटील अपयशी झाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असल्याचे एका वृत्तवाहिनीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले आहे.
दिल्लीत पार पडलेल्या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, संघटनमंत्री बी. एल.संतोष यांनी चंद्रकांत पाटील यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. केंद्र सरकारच्या योजना राज्यात योग्य पद्धतीने पोहोचवण्यात चंद्रकांत पाटील सपशेलपणे अपयशी ठरले आहेत. त्यामुळे केंद्रीय नेतृत्व पाटील यांच्यावर नाराज असल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण होत आहेत तरीपण त्यांना चोख प्रत्युत्तर देण्यात चंद्रकांत पाटलांना म्हणावे तसे यश आले नसल्याचेही केंद्राकडून म्हटले गेले आहे.
गेल्या काही दिवसात चंद्रकांत पाटील राज्यातील भाजपचे नेतृत्व करत असताना त्यांचा कारभार सर्वसमावेशक नसल्याच्या तक्रारी येत होत्या. हाच धागा पकडून शनिवारी झालेल्या तीन तासांच्या बैठकीत दिल्ली हायकमांडने चंद्रकांत पाटील यांची शाळा घेतल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी विरोधात रान उठवण्यात अपयश आल्याचेही भाजपच्या हायकमांडने निदर्शनास आणून दिले. येणाऱ्या काळात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी कार्यपद्धतीत सुधारणा करावी अशा सूचनाही भाजपा हायकमांडने दिल्या आहेत.