मुंबई (प्रतिनिधी) – लोकसभा निवडणूकीदरम्या शिवसेना-भाजपा युतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरलेला आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सांगत असतानाच दुसरीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष, महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मात्र असा कोणताही फॉर्म्युला ठरलेला नसल्याचे सांगितले. शिवसेना-भाजप महायुतीचा फॉर्म्युला नक्की करण्याची जबाबदारी उध्दव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. फॉर्म्युला करण्यावर काम सुरु आहे. पण शिवसेना-भाजप युती होणार हे शंभर टक्के असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप प्रदेश कार्यालयात निवडणूक समितीची बैठक होती. दिवसभर बैठका सुरु होत्या. त्यानंतर ते प्रसिध्दी माध्यमांशी ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, राज्यात युतीचा फॉर्म्युला नक्की करण्याची जबाबदारी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आहे. जागा वाटपाचा निर्णय अंतिम झाल्यावर महायुतीचे हे दोन्ही नेते त्याची घोषणा करतील.
लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागा वाटपाची घोषणा पत्रकार परिषदेत केली होती. त्याचप्रमाणे विधानसभेतील जागा वाटपाची घोषणा हे दोन्ही नेते पत्रकार परिषद घेऊन करतील, असे पाटील म्हणाले. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईत येत आहेत. त्यावेळी युतीची घोषणा होणार का असा प्रश्न पत्रकारांनी विचारला असता ते म्हणाले की, अमित शहा आल्यावरच घोषणा होईल असे काही नाही. पण जेव्हा केव्हा अंतिम निर्णय होईल तेव्हा जाहीर करू. पण युती होणार हे शंभर टक्के आहे.
पितृपंधरवड्याचा प्रश्न नाही
पितृपंधरवडा असल्याने युतीची घोषणा होत नाही याकडे चंद्रकांत पाटील यांचे लक्ष वेधले असता ते म्हणाले की, सध्या ज्या प्रकारचे वेगवान आयुष्य झाले आहे. त्यामध्ये पितृपंधरवडा नावाच्या संकल्पनेवर विश्वास जरी असला तरी व्यावहारिकदृष्ट्या ते शक्य नसते. त्यामुळे पितृपंधरवड्यानंतर करणार की आधी करणार हे अंतिम झाल्यावर एकमत झाल्यावर ठरेल.