विजयवाडा – आंध्रप्रदेश सरकारने तेलगु देसम पक्षाचे नेते चंद्रबाबू नायडू यांच्या सुरक्षेत कपात केली आहे. चंद्राबाबू नायडू यांना झेडप्लस कॅटॅगिरीची सुरक्षा पुरवण्यात येत होती पण त्याचा दर्जा आता कमी करण्यात आला असून त्यांच्या सुरक्षेसाठी जे एकूण 146 सुरक्षा जवान तैनात असत ते आता केवळ 67 इतके ठेवण्यात आले आहेत.
तेलगु देसम पक्षाने यावर तीव्र आक्षेप घेतला असून नायडू यांना असलेला धोका लक्षात घेऊन त्यांची पुर्वीचीच सुरक्षा व्यवस्था कायम ठेवावी अशी मागणी त्यांनी केली आहे. चंद्राबाबु यांच्या मुलाच्या सुरक्षेतही कपात करण्यात आली आहे. ते विधान परिषदेचे सदस्य आहेत. नायडू यांच्यावर सन 2003 साली तिरूपती येथे माओवाद्यांनी हल्ला करून त्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला होता पण त्यातून ते सुरक्षित वाचले आहेत. त्यांना अजूनही माओवाद्यांचा धोका कायम आहे असे तेलगु देसम पक्षाचे म्हणणे आहे.