हे वस्त्र की जणू मेघांची तलम ओढणी
तुझ्याभोवती सूर्यकिरणांनी ओवली?
हे वस्त्र की जणू धुक्यात
सुकुमार पहाट सजली?
हे वस्त्र की जणू
चांदण्यांत इंदिरा न्हाली
असं वर्णन ज्या साडीचं करता येईल ती साडी अर्थातच चंदेरी. तिचं वर्णन या कवितेतच इतकं सुंदर केले आहे की आपण त्याची वेगळी वैशिष्टे काय सांगणार? पण चंदेरी साडी म्हटलं की एक तलम पारदर्शक पोत डोळ्यासमोर उभा राहातो. इतका तलम की त्याला हात लावायला पण मन धजावत नाही.आणि ही साडी इतकी हलकी असते अंगावर नेसल्यावर तिचं वजनच जाणवत नाही!
अशा या तलम चंदेरीचा जन्म मध्यप्रदेश मधल्या अशोकनगर जिल्ह्यातल्या चंदेरी याच गावचा. आपल्याकडे ज्या ठिकाणी जे वस्त्र तयार होतं त्या वस्त्रप्रकाराला त्या ठिकाणचं नाव देण्याची पद्धत आहे. त्यामुळेच या चंदेरीला या गावाचं नाव पडलं.चंदेरी हे गाव माळवा आणि बुंदेलखंड या दोन गावांच्या सीमेवर आहे. या गावाला स्वत:चा समृद्ध इतिहास आहे. चंदेरी हा वस्त्रप्रकार इसवीसनाच्या दुसऱ्या ते सातव्या शतकाच्यामध्ये कधीतरी निर्माण झाला असावा असं वाटतं. त्याकाळी भारतात सगळीकडेच समृद्धी होती. जिथे ज्या गोष्टी तयार होत होत्या तिथे त्या विकल्या आणि वापरल्या जात होत्या त्यामुळे सगळीकडेच थोड्याफार फरकानं बारा बलुतेदार पध्दत अस्तित्वात होती.पण याच कारणामुळे या काळी आपल्याकडच्या वस्तू निर्यातही केल्या जात नव्हत्या.
इसवीसन 1350 दरम्यान झाशीहून काही कोष्टी विणकर चंदेरीला स्थायिक झाले आणि तेही याचप्रकारचं वस्त्र हातमागावर विणायला लागले. पण त्यानंतर आलेल्या मुघल राज्यकर्त्यांच्या काळात मात्र चंदेरीचा हा उद्योग खूप मोठ्या प्रमाणावर विकसित झाला. त्यानंतर मुसलमान विणकरही चंदेरी साडी विणायला लागले. नकाशावर चंदेरी हे गाव पाहिलं तर ते भारताच्या अगदी मध्यावर येतं. आणि मुघल काळात गुजरात, दख्खन, मेवाड आणि माळव्याला जायला तिथूनच मुख्य रस्ते असावेत. त्यामुळे त्याकाळी चंदेरीमध्ये तयार होणारं वस्त्र भारतामध्ये सगळीकडे पोहोचलंच शिवाय भारताबाहेरही ते निर्यात झाल्याच्या नोंदी आहेत. 1658 ते 1707 मध्ये औरंगजेबाच्या विषयी लिहिल्या गेलेल्या मासीर-ए-आलमगीर या ग्रंथात औरंगजेब ज्यांचा सन्मान करायचा आहे त्यांना हे वस्त्रभेट म्हणून द्यायचा असा उल्लेख आहे.
चंदेरी साडी पूर्णपणे हातमागावर तयार करतात. पूर्वी ही साडी फक्त सुतीच असायची. त्यातूनही फक्त पांढऱ्या रंगात तयार व्हायची. त्यानंतर ती गर्भरेशमी म्हणजे आडवा धागा रेशमी आणि उभा धागा सुती अशी तयार व्हायला लागली आणि त्याहीनंतर ती संपूर्ण रेशमामध्येही तयार व्हायला लागली. आता ही साडी या तीनही प्रकारात मिळते. सुरुवातीला कागदावर काय डिझाईन तयार करायची आहे याचं नियोजन केलं जातं. साडीचा रंग आणि सूत ठरवले जातात. नंतर हव्या त्या रंगात सूत रंगवलं जातं.आणि नंतर साडी विणतात. पारंपरिक चंदेरी ही शक्यतो एक किंवा जस्तीतजास्त दोनच रंगात तयार करतात. ते रंगही शक्यतो भडक नसतात. आता मात्र चंदेरी सगळ्याच रंगांत आणि रंगसंगतींमध्ये तयार केली जाते. त्यावर बुट्टे, रुपया, सूर्य, मोर किंवा भौमितिक आकार अशी चिन्हं नंतर वेगळ्या दोऱ्यानं विणली जातात. त्यानंतर त्यावर सोन्याची, चांदीची किंवा तांब्याची पूड शिंपडतात. त्यामुळे यासाडीची मागची आणि पुढची बाजू वेगळी असते. यासाडीसाठी रेशीम काढताना त्यातून डिंक काढून टाकत नाहीत. म्हणून या साडीला एक वेगळीच चमक येते आणि हेच चंदेरीचं वैशिष्ट्य आहे. शिवाय ही साडी त्यातल्या अगदी बारीक धाग्यामुळे वजनाला अतिशय हलकी आणि जवळपास पारदर्शक होते. त्यामुळे नेसल्यावर तिचं काहीच वजन जाणवत नाही. याच गोष्टीमुळे ज्यांची त्वचा खूप नाजूक आहे अशा लोकांसाठी विशेषत: लहान मुलांसाठी चंदेरीचं हे कापड उपचाराचा एक भाग म्हणून सिद्ध झालं आहे.
आता तर चंदेरीचे ड्रेस, कुडते, पर्सेस, जॅकेट्स आणि असे अनेक प्रकार तयार केले जातात. फिल्मी सिताऱ्यांमध्ये एकदा हेमा मालिनीला तुम्हाला कोणत्या प्रकारची साडी आवडते? असं विचारल्यावर त्यांनीही चंदेरीचं नाव घेतल्याचं आठवंतय. आताच्या पिढीतल्या करिना कपूरलाही चंदेरी साड्या खूप अवडतात असंही अनेक ठिकाणी दिसतं.तर अशीही विणलेली हवा एकदा तरी आपल्या भोवती लपेटली जावी असं प्रत्येक सुंदरीला वाटायला लावणारी चंदेरी आपल्या मनात मात्र घट्ट रुतून बसली नाही तरच नवल!
अमृता देशपांडे