धामणी – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील मांदळेवाडी, लोणी, निरगुडसर या परिसरात चंदनचोरांचा मोठा सुळसुळाट झाला आहे.
अगोदरच दुष्काळाचे चटके सहन करणाऱ्या शेतकऱ्यांची आता या चंदनचोरांनी झोप उडविली आहे. मांदळेवाडी येथे ज्योती अरूण गोरडे यांच्या घराजवळ असणारे चंदणाचे झाड चंदनचोरांनी शनिवारी (दि. 15) रात्री दोन ते तीन वाजण्याच्या सुमारास बुंध्यापासून कापून नेले. तर निरगुडसर येथील प्रगतशील शेतकरी जयसिंग खिलारी व शिवाजी खिलारी यांचीही गेल्या आठवड्यात चार ते पाच चंदनाची झाडे कापून नेली. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तरी वनविभागाने या चंदनचोराचा बंदोबस्त करावा, अशी मागणी या परिसरातील स्थानिक शेतकरी व नागरीकांनी केली आहे.