पुणे (प्रतिनिधी) – गेले काही दिवसांपासून उन्हामुळे भाजून निघालेल्या राज्यातील नागरिकांना आता थोडा दिलासा मिळणार आहे कारण उद्यापासून (शनिवार) राज्यात ढगाळ हवामानासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
अम्फान वादळामुळे उत्तरेकडील उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्राकडे आल्याने गेले आठवडाभर राज्यातील विविध भागात उष्णतेची लाट निर्माण झाली.सुर्य आग ओकत असल्याने वायव्य आणि मध्य भारतातील राज्यांमध्ये उन्हाचा चटका वाढला होता आता मात्र राज्यातील तापमानात काहीशी घट होताना दिसत आहे.आज सुद्धा राज्यातील विविध भागातील तापमानाचा पारा खाली घसरला होता.विदर्भात वगळता राज्यातील मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात कमाल तापमान आज कमी नोंदविले गेले आहे. पुणे, सातारा आणि सांगली मधील तापमान 37 अंशापर्यत खाली आहे.तर मराठवाड्यातील अनेक भागात तापमानात 40 अंशाच्या आसपास आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनूसार राज्यात पुर्वमोसमी पावसाला पोषक हवामान असल्याने उद्यापासून वादळी पावसाला सुरूवात होणार आहे. सोमवार पर्यत पाऊस पडण्याचा अंदाज आहे. रविवारी कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.