मुंबई – भाजप नेते आणि खासदार नारायण राणे यांचं ड्रिम प्रोजेक्ट असलेल्या लाईफटाईम या मेडिकल कॉलेजचं उद्घाटन आज सिंधुदुर्गात केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपचे चाणक्य म्हणून परिचीत असेलल्या अमित शाह यांच्या हस्ते झाले आहे. खुद्द अमित शाह महाराष्ट्रात येणार असल्याने राज्यातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी ऑपरेशन लोट्स सुरू होणार असल्याचे राणे यांनी म्हटले होते. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपला खोचक टोला लागावला आहे.
महाराष्ट्रातील भूमीत कोणी चाणक्य बिणक्य चालणार नाही, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात तिन्ही पक्षांचे सरकार मजबुतीने उभे आहे. त्यामुळे वर्षभर प्रयत्न करून सुद्धा काही झाले नाही,’ असं छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. नाशिकमधील येवला मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमात भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली.
अमित शाह यांच्या कोकण दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नारायण राणे यांनी अमित शहा यांच्या पायगुणामुळे सरकार जाईल असं म्हटलं होतं. तसेच भाजपाचे ऑपरेशन लोटस पुन्हा सुरू होईल, अशी प्रतिक्रिया दिली होती. त्यावर भुजबळांनी ‘कोणी चाणक्य बिणक्या महाराष्ट्रातील भूमीत चालणार नाही. महाराष्ट्रातील जनतेने हे सरकार स्वीकारले आहे. ज्यावेळी जनता सरकारला स्विकारते, तेव्हा कोणी हात लावू शकत नाही,’ असे भुजबळांनी स्पष्ट केले.