चेन्नई: कर्णधार विराट कोलहीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने टी-20 मालिकेपाठोपाठ एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतही आपल्या भक्कम फलंदाजीचे दर्शन घडविले. प्रथम फलंदाजी करताना प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर देखील वेस्ट इंडीजसमोर विजयासाठी 288 धावांचे आव्हान ठेवले. सातत्याने टीकेचा धनी होत असलेल्या ऋषभ पंतने 71 धावांची खेळ करत अखेर टीकारांची बोलती बंद केली.
वेस्ट इंडीजने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजी दिली. भारताने वेस्ट इंडीजसमोर 288 धावा करण्याचे आव्हान ठेवले. प्रमुख फलंदाज लवकर बाद झाल्यानंतरही कोणतेही दडपण न घेता श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांनी भारताच्या डावाला आकार दिला. अखेर पंतला सुर गवसला आणि त्याने टीकाकारांना चोख प्रत्त्युत्तर देताना शानदार 71 धावांची खेळी केली. कर्णधार विराट कोहलीने शिवम दुबेला पदार्पण करण्याची संधी दिली. रोहित शर्मा आणि लोकेश राहुल यांना भक्कम सलामी देण्यात आपयश आले. राहुल केवळ 6 धावा करून बाद झाला. यानंतर कर्णधार विराट कोहली आणि रोहित यांनी डाव सावरण्याचा प्रतय्न केला मात्र कोहलीने निराशा केली.
वेस्ट इंडीजचा डावखुरा वेगवान गोलंदाज शेल्डन कोर्टेल यानेच कोहलीची दांडी उडविली. कोहली केवळ 4 धावा करून परतला तेव्हा भारताची अवस्था 2 बाद 25 अशी होती. त्यानंतर मात्र श्रेयस अय्यरने रोहित सोबत धावफलक हलता ठेवला. ही जोडी देखील डाव सावरु शकली नाही. वेस्ट इंडीजचा कर्णधार कॅरन पोलार्डने रोहित शर्माला 36 धावांवर बाद केले. संघाची स्थिती बिकट असताना अय्यर आणि ऋषभ पंत ही जोडी जमली. या जोडीने चौथ्या विकेटसाठी 114 धावांची शतकी भागिदारी केली. अय्यर 70 धावा करून बाद झाला. त्याने 5 चौकार आणि एक षटकार मारला. त्यापाठोपाठ पंत देखील 71 धावा करून बाद झाला. मात्र पंतने वारंवार येत असलेली अपयशाची मालिका अखेर खंडित केली. हे दोघे बाद झाल्यानंतर अखेरच्या 10 षटकात केदार जाधव (40), रवींद्र जडेजा (21) यांनी 77 धावा केल्या व संघाला अडीचशेचा पल्ला पार करुन दिला.
हे दोघे परतल्यावर पदार्पण करणारा शिवम दुबे अपयशी ठरला. त्यानंतर मात्र आणखी वेगाने धावा करण्यात तळातील फलंदाज कमी पडले व भारताला 287 धावा उभारता आल्या. वेस्ट इंडीजकडून अल्झारी जोसेफ, शेल्डन कॉट्रेल व केमो पॉल यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. सातत्याने टीका होत सलेल्या यष्टीरक्षक पलंदाज ऋषभ पंतने अखेर अर्धशतकी खेळी केली. ही खेळी संघासाठी अत्यंत महत्वाची ठरली आहे. त्याचबरोबर पंतने महेंद्रसिंह धोनीसह अनेक दिग्गज यष्टीरक्षकांच्या पंक्तीत स्थान मिळवले आहे. चेपॉकच्या मैदानावर सर्वाधिक धावा करणाऱ्या यष्टीरक्षक फलंदाजांच्या यादीत आता पंतचा समावेश झाला आहे.
जडेजाबाबत पंचाचे दुर्लक्ष
भारताच्या डावातील 48 व्या षटकांत रवींद्र जडेजा धाव घेण्यासाठी धावला पण वेस्ट इंडिजच्या रॉस्टन चेसने थेट यष्टींवर चेंडू फेकला. यावेळी पंचांनी दुर्लक्ष केले. विंडिजच्या खेळाडूंनी तिसऱ्या पंचांकडे दाद मागण्याचा इशारा केल्यावर पंचांनी दाद मागितली. त्यात जडोजा धावबाद असल्याचे स्पष्ट दिसले. मात्र या घटनेनंतर भारताचा कर्णधार विराट कोहली व वेस्ट इंडिजचा कर्णाधार कॅरन पोलार्ड यांनी निराशा व्यक्त केली.