नवी दिल्ली: दिल्लीत शेतकरी आंदोलनाला आता जवळपास अडीच महिन्याचा कालावधी होत आहे. सरकारसोबत झालेल्या अनेक बैठकांनतरही नवीन कृषी कायदा मागे घेण्याच्या भूमिकेवर शेतकरी ठाम आहेत. संयुक्त किसान मोर्चा संघटनेकडून आधी घोषित केल्यानुसार आज ‘चक्का जाम’ करण्यात येणार आहे. आज दुपारी 12 ते 3 या वेळेत हे देशव्यापी आंदोलन केले जाणार आहे.
शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी सांगितले आहे की, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये चक्का जाम होणार नाही, मात्र या दोन्ही राज्यांमध्ये एक लाख शेतकरी स्टॅंडबायमध्ये असतील. राकेश टिकैत म्हणाले की, “चक्का जाम वापस घेतलेला नाही. मात्र या कार्यक्रमात थोडा बदल केला आहे. यूपी आणि उत्तराखंडमधील शेतकरी आपल्या तालुका आणि जिल्हा मुख्यालयात जाऊन अधिकाऱ्यांना निवेदने देतील. या निवेदनात तिन्ही कृषी कायदे रद्द करणे आणि एमएसपीवर कायद्याची मागणी करतील. शेतकऱ्यांनी हे आंदोलन शांततापूर्ण करावे, असे आवाहन देखील टिकैत यांनी केले आहे.
Delhi: Extensive barricading measures undertaken at Ghazipur border with water cannon vehicles deployed, as a preemptive measure to deal with possible disturbances resulting from 'Chakka Jaam' calls by farmer unions protesting farm laws
Visuals from the Delhi side of the border pic.twitter.com/wQcfu5CTDN
— ANI (@ANI) February 6, 2021
संयुक्त किसान मोर्चा (एसकेएम)च्या वतीनं सांगण्यात आले आहे की, दिल्लीमध्ये चक्का जाम होणार नाही. कारण तिथे आधीपासून होत असलेल्या आंदोलनामुळे चक्का जाम सारखी परिस्थिती आहे. इथे एन्ट्री मार्ग खुले असतील. जिथं शेतकऱ्यांचे आंदोलन सुरु आहे, ते मार्ग मात्र बंद राहतील. ‘चक्का जाम’ आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण आणि अहिंसक असेल, असेही त्यांनी सांगितले आहे.
भारतीय किसान यूनियनचे राष्ट्रीय प्रवक्ता राकेश टिकैत यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांना एक नवा फॉर्म्युला दिलाय. टिकैत यांनी म्हटलं आहे की, प्रत्येक गावातून एक ट्रॅक्टरवर 15 शेतकरी आणि 10 दिवसांचा वेळ घेऊन या. त्यामुळं या आंदोलनात शेतकरी सहभागी होत राहतील आणि नंतर परत जाऊन ते शेतीही करु शकतील.टिकैत यांनी म्हटलं आहे की, शेतकरी संघटनांचे नेते सरकारशी चर्चा करण्यासाठी नेहमीच तयार आहेत. मात्र सरकारला चर्चा करायचीच नाही. सरकार या आंदोलनाला दीर्घकाळ चालू देण्याच्या मनस्थितीत नाही. मात्र आपल्याला हे आंदोलन दीर्घकाळ चालवायचे आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी हा फॉर्म्युला आहे. यामुळं प्रत्येक शेतकरी हा आंदोलनात सहभाग घेईल आणि आंदोलन दीर्घकाळ चालू शकेल, असं टिकैत यांनी म्हटले आहे.
आपल्या अश्रूंनी शेतकरी आंदोलनाला नवसंजीवनी देणारे भारतीय किसान युनियनचे (बीकेयू) नेते राकेश टिकैत यांची शुक्रवारी गाझीपूर सीमेवर गांधीगिरी पाहायला मिळाली. प्रशासनाने खिळे लावलेल्या ठिकाणी टिकैत वृक्षारोपण करताना दिसले. 26 जानेवारीला राजधानी दिल्लीत ट्रॅक्टर रॅलीच्या वेळी झालेल्या हिंसाचारानंतर पोलिसांनी गाझीपूरसह सर्व आंदोलनस्थळांवर तटबंदी उभारली आहे. गाझीपुरात आंदोलकांची आवक-जावक थांबवण्यासाठी पोलिसांनी रस्त्यावर खिळे ठोकले होते. दरम्यान, टीकेनंतर अनेक ठिकाणाहून खिळे हटविण्यात आले आहे. राकेश टिकैत यांनी खिळे ठोकलेल्या जागेवर डंपरने माती टाकली आणि नंतर फावड्याने माती पसरवून तिथे वृक्षारोपण केले.