कोंडी फुटणार की नाही; नागरिकांनी उपस्थित केला संतप्त सवाल
महाळुंगे इंगळे- चुकीच्या ठिकाणी बांधण्यात आलेले उड्डाण पूल, वाहनचालकांचा बेजाबदारपणा, पथदिव्यांची वानवा, महामार्गावर अनेक ठिकाणी तुटलेले प्रकाश रोधक, अवैध वाहतूक, पोलिसांचा चालढकलपणा आदींमुळे चाकण शहरात मोक्याच्या ठिकाणी वाहतूककोंडी होत आहे. याचा मोठा फटका स्थानिकांसह प्रवाशांना बसत आहे. चाकणमध्ये नित्याच्या होत असलेल्या या वाहतूककोंडीने चाकणकर नागरिक रडकुंडीला आले असून, श्वास कोंडलेले नागरिक आता वाहतूककोंडी फुटणार कधी? असा संतप्त वाल नागरिकांसह प्रवशांनी उपस्थित केला आहे.
चाकणमध्ये मोठी औद्योगिक वसाहत, शाळा, महाविद्यालय, शासकीय, निमशासकीय कार्यालये व कांद्याचे मोठे मार्केट असल्याने येथे कायमच वर्दळ असते. भाजी विक्रेते, व्यावसायिक, यांची दुकाने अगदी रस्त्यालगत थाटली असल्याने वाहनचालकांना वाहने पुढे नेताना मोठी सर्कस करावी लागते. पुणे-नाशिक महामार्गावर चाकण गावच्या हद्दीत तळेगाव चौक व आंबेठाण चौक येथे नको त्याठिकाणी उड्डाणपूल बांधण्यात आले आहेत. त्याचा काहिच उपयोग होत नाही. पुढे चाललेल्या वाहनाला मागे टाकण्याच्या प्रयत्नात प्रत्येकाला झालेलीं घाई यामुळे याठिकाणी वाहतूक कोंडीत भर पडत आहे.
रस्त्यांच्या तुलनेत ररस्त्यावर येत असलेल्या वाहनांची संख्या आता वाढली आहे. अपघातग्रस्तांना रुग्णवाहिकेतून दवाखान्यात न्यावयाचे असेल तर वाहतूककोंडीतून जिकरीचे झाले आहे. चाकण शहरामधील प्रमुख चौकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणे वाढत चालल्याने चौकही अरुंद होत चालले आहेत. त्यामुळे येथील चौकांचाही श्वास गुदमरला आहे. मोकाट वाहने दामटनारांची संख्या आता वाढत चालल्याने येथील सेवा रस्त्यावर अवजड वाहने धावताना दिसू लागली आहेत. मोठे टेलर, कंटेनर, अवैध प्रवासी वाहनांची वाढलेली संख्या, बेशिस्त वाहनचालक आदींमुळे सेवा रस्तेही “ओव्हर फ्लो’होवू लागले आहेत.
- यामुळे कोंडीत अधिक भर
बेशिस्त वाहनचालकांची वाढती संख्या, रस्त्यालगत उभी केली जात असलेली वाहने, पोलिसांचे त्याकडे होणारे दुर्लक्ष, अवैध प्रवासी वाहतूक, अरुंद रस्ते, वाढती अतिक्रमणे, बस थांबे असून नसल्यासारखे यामुळे वाहतूककोंडीत आणखीन भर पडत आहे. त्याचा येथील नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. - या ठिकाणी उडतो वाहतुकीचा बोजवारा
खेड तालुक्याचे प्रवेशद्वार असलेल्या चिंबळी फाटा, कुरुळी फाटा, स्पाईसर चौक, आळंदी फाटा, तळेगाव चौक, आंबेठाण चौक, माणिक चौक आदी मोक्याच्या ठिकाणी नेहमीच वाहतूककोंडी होते. ही वाहतूक कोंडी आता सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. चाकण येथे दर शनिवारी व दर बुधवारी मोठा बाजार भरत असल्याने परिसर गजबजून जातो. आठवडे बाजाराच्या दिवशी येथील आंबेठाण, तळेगाव, माणिक चौक या मोक्याच्या ठिकाणी वाहतुकीचा अक्षरशः बोजवारा उडालेला असतो.