औद्योगिक वसाहतीतील रस्त्याची चाळण : दुतर्फा अनधिकृत पार्किंग
शिंदे वासुली (वार्ताहर) – चाकण-तळेगाव राज्य मार्ग दिवसेंदिवस वाहतुकीसाठी अडथळ्यांची शर्यतीत अडकला असल्याने वाहतुकीची मोठी समस्या निर्माण होत आहे. खालुंब्रे , महाळूंगे , खराबवाडी व चाकण परिसरातील औद्योगिकीकरण व त्या अनुषंगाने झपाट्याने वाढलेले नागरिकरण यामुळे या रस्त्यावर 24 तास मोठी वर्दळ असते. औद्योगिक वसाहत विकसित होत असताना अंतर्गत व मुख्य रस्त्यांचे जाळे तयार करण्यात आले असून वाहतूक सुरळीत होण्यासाठी एमआयडीसी प्रशासन आवश्यक त्या उपाययोजना करीत आहेत; परंतु महाळुंगे इंगळे ते खालुंब्रेतील एच. पी. चौकापर्यंत वाहतुकीचे तीनतेरा वाजलेले आहेत. रस्त्याच्या साईडपट्ट्या जागच्या जागी खचल्यामुळे बजाज कंपनीकडे येणाऱ्या व जाणाऱ्या मालवाहतूक वाहनांचे अपघात होत आहेत.
महाळूंगे एमआयडीसीतील एचपी चौकापासून बजाज कंपनीपर्यंत रस्ता मृत्यूचा सापळाच झाला आहे. कुठून कधी आणि कसे रस्त्याच्या बाजूलाच असणाऱ्या कंपन्यांतून मालवाहतूक वाहने रस्त्यावर येईल याचा काही नेम नाही. मुळातच अरुंद असलेला हा रस्ता पावसाचे तसेच एमआयडीसी परिसरातील सांडपाणी रस्त्यावरच येत असल्याने जागोजागी उखडलेला आहे. बजाज, लॉरेल, कला जनसेट या व अन्य कंपन्यांच्या समोर रस्त्याच्या दुतर्फा अनाधिकृतपणे कंटेनर, ट्रक, टेम्पो अशी मालवाहतूक वाहने बिनधास्त उभी केलेली असतात. त्यामुळे संध्याकाळच्या सुमारास याठिकाणी मोठी वाहतूककोंडी होत असते.
हा रस्ता राज्य महामार्ग असून याची देखभाल दुरुस्तीची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. या रस्त्यावरून सर्वसामान्यांना प्रवास करताना मोठी गैरसोय होते, वाहतुकीच्या समस्या निर्माण होतात;परंतु बांधकाम खाते गांभीर्याने लक्ष देत नसल्याची नागरिक व कामगारांची ओरड आहे. याच ठिकाणी काही उद्योजक, कारखानदार यांनी रस्त्यालगत अतिक्रमणे केली असल्याचे सांगितले जाते. रस्त्याच्या साईडपट्ट्या खचल्या आहेत तर काही ठिकाणी त्या नाहिशा झालेल्या आहेत. रस्त्यावरील खड्डे व रस्त्यावर येणारे पाणी, या व अशा अनेक समस्या असताना राज्याचे बांधकाम विभाग मात्र नुसती बघ्याची भूमिका घेत आहेत.
संबंधित अधिकाऱ्यांकडून मला मिळालेल्या माहितीनुसार चाकण-तळेगाव रस्त्यावरील वाहतुकीचीकोंडी व अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी नवलाख उंबरे ते करंजविहीरे ते चाकण, तसेच तळेगाव शहर, इंदोरीच्या बाहेरून भंडारा डोंगर ते चाकण एमआयडीसी टप्पा दोनमधील शिंदे गाव ते पुढे चाकण असे नवीन रस्ते होत आहेत. त्याचप्रमाणे पुढील काळात चाकण व राजगुरू नगर व महाळूंगे एमआयडीसीतील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने काम करणार आहे.
– दिलीप मोहिते पाटील, आमदार, खेड