आपले मराठी वाङ्मय अतिशय समृद्ध आहे. काहीही भरीव कथानक नसलेल्या आणि तरीही वर्षानुवर्षे चालणाऱ्या आजच्या टीव्हीवरील मालिका पाहिल्या तर अनेकदा असे वाटते की, या मंडळींनी मराठी साहित्याचा धांडोळा घेतला तर त्यांना चांगल्या मालिका बनवण्यासाठी कितीतरी उत्तमोत्तम कथानके मिळतील. सुदैवाने शॉर्टफिल्म्स मात्र अजून तरी वेगळे विषय हाताळत आहेत. मराठीतले विख्यात साहित्यिक जी. ए. कुलकर्णी यांच्या “चैत्र’ नावाच्या कथेवरील त्याच नावाची शॉर्ट फिल्म पाहण्यासारखी आहे.
पूर्वी गावागावांतून चैत्रातले हळदीकुंकू चांगले मोठे होत असे. मोठ्या श्रीमंतांच्या घरून सगळ्या गावाला बोलावणे जात असे. ओळख असो नसो; घरात काम करणाऱ्या बाईकडून प्रत्येक घरी जाऊन आमंत्रण दिले जाई. सवाष्णीनं हळदीकुंकाला नाही कसं म्हणायचं, बोलावल्यावर जायलाच हवं अशा विचाराने प्रत्येक बाई जातेच.
एक साधे ब्राह्मणाचे कुटुंब. नवराबायको आणि एक आठदहा वर्षांचा मुलगा. एकमेकांचे परस्परांवर खूप प्रेम. मुलाला घेऊन आई नाईकवाड्यावर हळदीकुंकाला जाते. ओल्या हरभऱ्याची ओटी, आंब्याची डाळ, पन्हं… दिलं जात असतं. हिची कुणी ओटी भरत नाही. वाट बघून ती म्हणते, “ओटी भरताय ना माझी?’ वाड्याची नवीन सून तोऱ्यात म्हणते, “तुम्ही मघाशी येऊन गेलात ना? काय बाई, हरभऱ्याच्या चार दाण्यांसाठी लोक पुन्हापुन्हा येतात!’ मुलाची आई स्वाभिमानी. म्हणते, “मी पुन्हा नाही आलेली. बोलावलंत म्हणून आले. ओटीचा मान असतो. सवाष्णीनं असं रिकाम्या ओटीनं तुमच्या घरातून परत जाणं बरं नाही. म्हणून…’ सासूही सुनेला घरी आलेल्या सवाष्णीची ओटी भरायला सांगते. पण सून लक्ष देत नाही. आई मुलाला घेऊन काही न बोलता तावातावानं घरी येते.
घरी आल्यावर ती स्वतःचे दागिने नवऱ्यापुढे ठेवते आणि गहाण ठेवून पैसे आणायला सांगते. तोही तिला काही विचारत नाही. तसंच काही कारण असल्याशिवाय ही दागिन्यांना हात लावणार नाही हे त्याला माहीत असते. मग तीच सांगते की, ह्या वेळी नेहमीसारखं पाच बायकांचं हळदीकुंकू करण्याऐवजी सगळ्या गावाला मी हळदीकुंकाला बोलावणार आहे. पूजेचं सगळं सामान आणलं जातं. पिप भरून ती पन्हं करते. घराची जोरदार सजावट होते. नाईकवाड्यावरून बोलावणी करीत जशी बाई फिरते, तशी हिच्याही घरच्या हळदीकुंकाची बोलावणी गावभर जातात. हळदीकुंकाचा मोठा जंगी समारंभ होतो. पण नाईकवाड्यावरून कुणीच येत नाही. ही हिरमुसली होऊन पायरीवर बसते. तोच टांगा वाजतो. सासूसून दोघीजणी येतात. ही दोघींना पाट मांडते, रांगोळी काढते. मानाने त्यांना हळदीकुंकू, डाळ देऊन हरभऱ्यानं ओटी भरते. मुलाला पन्हं द्यायला सांगते तर त्याच्याही डोक्यात त्यांनी केलेला अपमान लक्षात असतो. पण आई दटावून त्याला पन्हं द्यायला लावते. सून “ह्यांच्याकडचं होतं होय बोलावणं, मला नव्हतं माहीत.’ असं काहीसं म्हणते आणि बाहेर जाऊन टांग्यात बसते. सासूला माणुसकी आहे. मुलाची आई दुखावली आहे, हे तिला समजते. त्यांच्या घरी हिचा अपमान झाल्याबद्दल सासू तिची क्षमा मागते.
दुसऱ्या वर्षीचा चैत्र येतो. पुन्हा चैत्रातले हळदीकुंकू. ह्याही वेळी नाईकवाड्यावरून साऱ्या गावाला बोलावणी जातात. पण हिच्या घरी मात्र स्वतः सासू येते. टांग्याचा आवाज येताच ही डोकावून पाहते. मुलाला म्हणते, “मी न्हाणीघरात आहे असे सांग. त्यांना कुंकू लावून घ्यायला कोयरी दे.’ आणि ही आत निघून जाते. त्या सासूबाई आत येताच मुलगा त्यांना सांगतो की, आई न्हाणीघरात आहे. त्या तिच्याशी बाहेरच्या खोलीतूनच बोलू लागतात, “कालच काशीवरून आले. सगळीकडे बाई गेली आहे बोलवायला. पण तुमच्याकडे मी स्वतः आले. मनात राग ठेवू नका. आज नक्की या. मी तुमची मानाने ओटी भरेन.’ ही आतून हो, हो म्हणते. त्यांच्यासमोर काही येत नाही. सासूबाई निघून गेल्यावर ही बाहेर येते. मुलगा म्हणतो, “आपले बाबा वारले हे त्यांना सांगायचं नव्हतं का?’ तेव्हा हिच्या भकास चेहऱ्यावर प्रकाश पडतो आणि आपल्याला कळते की, ही आता विधवा झाली आहे. मुलाला म्हणते, “त्यांना कळेलच नंतर. पण त्या दारात आलेल्या असताना मी त्यांना कशाला निराश करू? आपल्याला चिखलातून चालत जावं लागलं तरी तो चिखल इतरांवर उडणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी.’ सोनाली कुलकर्णी, लालन सारंग यांनी फार प्रभावी भूमिका केल्या आहेत. जीएंच्या कथेप्रमाणेच या फिल्मचाही मनावर गडद परिणाम होतो.
मायक्रोफिल्म
माधुरी तळवलकर