सात विद्यार्थ्यांना फोडता आला नाही भोपळा
पुणे – राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) विधी अभ्यासक्रमासाठी (एलएलबी) घेण्यात आलेल्या सीईटीचा निकाल जाहीर करण्यात आला. 150 गुणांसाठी झालेल्या या परीक्षेत 138 हे सर्वाधिक गुण असून, सात विद्यार्थ्यांना शून्य गुण मिळाले आहेत.
इयत्ता बारावीनंतर पाच वर्षे मुदतीचा हा विधि अभ्यासक्रम आहे. या परीक्षेसाठी 20 हजार 276 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 18 हजार 144 विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. या परीक्षेच्या निकालाचा तपशील सीईटी सेलने संकेतस्थळाद्वारे जाहीर केला. परीक्षा दिलेल्यांपैकी केवळ एकाच विद्यार्थ्याला 138 गुण मिळवता आले.
त्यानंतर प्रत्येकी एका विद्यार्थ्याने अनुक्रमे 137 आणि 136 गुण मिळवले. दोन विद्यार्थ्यांनी 135, तर तीन विद्यार्थ्यांनी 134 गुण प्राप्त केले. 40 ते 113 या दरम्यान गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. तर सात विद्यार्थ्यांना भोपळाही फोडता आला नाही, असे सीईटी सेलने सांगितले. दरम्यान, या निकालानंतर आता प्रवेश प्रक्रियेला वेग येईल. “कॅप’ फेरीद्वारे विद्यार्थ्यांना प्रवेश दिले जाणार असल्याने आता ही फेरी कधी सुरू होणार, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागले आहे.