दहावी, बारावी झालेल्या विद्यार्थ्यांची पायपीट टळणार
पुणे – दहावी आणि बारावी परीक्षेच्या निकालानंतर विविध दाखले घेण्यासाठी होणारी गर्दी लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. महा-ई-सेवा केंद्र आणि सेतू केंद्रामधून दाखले देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. येथे जाणे ज्या विद्यार्थ्यांना अथवा पालकांना शक्य नाही, अशांसाठी आपले सरकार पोर्टलवरून दाखल्यांसाठी ऑनलाइन अर्ज करता येणार आहे. त्यामुळे घरबसल्या विद्यार्थ्यांना दाखले मिळणार आहे.
दहावी व बारावी परीक्षेचा निकाल जुलै महिन्यात लागण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रवेशासाठी उत्पन्नाचा दाखला, रहिवासी प्रमाणपत्र, जातीचा दाखला असे विविध प्रकारचे दाखले घेण्यासाठी नागरी सुविधा केंद्रात मोठी गर्दी होते. एकावेळेस हजारो अर्ज आल्यानंतर त्याचा ताण यंत्रणेवर येतो. तर दाखले वेळेत न दिल्यास विद्यार्थी आणि पालकांना त्रास सहन करावा लागतो.
हे लक्षात घेऊन गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जिल्हा प्रशासनाकडून विविध उपाययोजना सुरू केल्यामुळे त्याचा दिलासा नागरिकांना मिळत आहे. यामध्ये महा-ई-सेवा केंद्रांची संख्या वाढवली आहे. त्यामुळे तहसीलदार कार्यालयात दाखल्यांसाठी हेलपाटे मारावे लागत नाही. घराजवळील महा-ई-सेवा केंद्रांमध्ये दाखले मिळत आहे. करोना पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने आवश्यक ती खबरदारी घेत महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे तेथून दाखल्यांसाठी अर्ज करण्यास सुरुवात झाली आहे. तसेच, दाखले वितरीत करण्यात येत आहे.
शहरात कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील महा-ई-सेवा केंद्र सुरू करण्यात आली आहे. याठिकाणी विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. त्याचबरोबर आपले सरकार पोर्टलवरून ऑनलाइन पध्द्धतीनेसुद्धा विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे. दाखल्यांसाठी होणारी गर्दी लक्षात घेता आवश्यक ते मनुष्यबळ उपलब्ध केले आहे. विद्यार्थ्यांना लवकरात लवकर दाखले देण्याचे नियोजन केले आहे.
– तृप्ती कोलते-पाटील, तहसीलदार, पुणे शहर