पुणे – करोनोत्तर काळात वाहतूक क्षेत्रात प्रभावी बदल पाहायला मिळत आहे. सद्यस्थितीत शहरातील बहुतांश नागरिकांना बस, रिक्षा यासारख्या सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांद्वारे प्रवास करताना धोका वाटत आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिक खासगी वाहनाने प्रवास करण्याला प्राधान्य देत आहेत. त्यातही स्वत:चे चारचाकी वाहन घेण्याकडे कल वाढत आहे. यामुळे “अनलॉक’मध्ये वाहन चालविण्याचे प्रशिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढत असल्याचे आपटे ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक अमेय आपटे यांनी सांगितले.
भारतातील पहिले ड्रायव्हिंग स्कूल असणाऱ्या आपटे ड्रायव्हिंग स्कूलने शंभराव्या वर्षात पदार्पण केले आहे. याची सुरुवात त्रिंबक रामचंद्र आपटे यांनी केली. तर या क्षेत्रात सध्या चौथी पिढी कार्यरत असून, अमेय आपटे या ड्रायव्हिंग स्कूलची धुरा सांभाळत आहेत. आपटे ड्रायव्हिंग स्कूलच्या ऑफीसमध्ये वाहतुकीचे नियम, वाहनांची मूलभूत माहितीचे फलक बसविण्यात आले आहे. यासह वाहनांची चासी, इंजिनदेखील असून याद्वारे प्रशिक्षण देण्यात येते. स्कूलच्या शंभरीनिमित्त संचालक अमेय आपटे यांच्याशी “प्रभात’ने संवाद साधला. यावेळी त्यांनी वाहन चालवितानाचे तंत्र, बदलते तंत्रज्ञान, ड्रायव्हिंग स्कूलची वाटचाल आदी विषयांची माहिती दिली.
1921 मध्ये माझ्या पणजोबांनी “आपटे ड्रायव्हिंग स्कूल’ची स्थापना केली असून माझे आजोबा, वडील, काका देखील या क्षेत्रात कार्यरत आहेत. या शंभर वर्षांच्या कालावधीत गाड्यांचे प्रकार देखील बदलले. शंभर वर्षांपूर्वी फियाट, पद्मिनी या गाड्यांपासून आता धावत असणाऱ्या वाहनांचे प्रशिक्षण आम्ही देत आहोत. त्याकाळी महिलांना प्रशिक्षण देण्यासाठी माझ्या आजीने देखील या क्षेत्रात पदार्पण केले. सुमारे 1950च्या दरम्यान माझ्या आजीकडे ट्रक चालविण्याचा देखील परवाना होता. माझ्या आत्यादेखील वाहनांचे प्रशिक्षण देत होत्या. अनेकांच्या पिढ्यान्पिढ्या आमच्याकडे शिकत आहेत, असे आपटे यांनी सांगितले.
आठवणींना दिला उजाळा…
माझ्या आजोबांनी एका डोंबाऱ्याचा खेळ करणाऱ्याला गाडी चालविण्याचे प्रशिक्षण दिले होते. त्यानंतर ते रोज ट्रक घेऊन यायचे आणि आजोबांना नमस्कार करून जायचे. ऑफीस बंद असेल, तर बाहेरून नमस्कार करायचे. आजोबांनी “तुला जमतील तसे पैसे दे’, असे म्हणून गाडी शिकवली होती. “तुमच्यामुळे माझे आयुष्य सुधारले’, असे म्हणत ते कृतज्ञता व्यक्त करायचे. अजूनही आमच्याकडे गाडी शिकून गेलेले नागरिक आमच्याशी आवर्जून संपर्क साधतात, असे आपटे यांनी सांगितले. याशिवाय सध्याचे मराठी आणि हिंदी चित्रपट सृष्टीतील दिग्गज म्हणजे तत्कालीन एफटीआयआयचे (फिल्म ऍन्ड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडीया) विद्यार्थीदेखील पुण्यात शिक्षणासाठी राहत होते. त्यामुळे त्यांनी आपटे ड्रायव्हिंग स्कूलमध्ये प्रशिक्षण घेतले आहे. आमच्याकडे प्रशिक्षण घेतलेल्या एका आजोबांनी 1926 मध्ये वाहन प्रशिक्षण घेतानाचा फोटो आम्हाला दिला असल्याचे त्यांनी नमूद केले.
“करोना’साठी खबरदारी…
करोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशिक्षणार्थींना मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करणे बंधनकारक केले आहे. प्रत्येक बॅचनंतर गाडीचे निर्जंतुकीकरणदेखील करण्यात येते. याशिवाय प्रशिक्षणार्थींना करोना सदृश्य लक्षणे दिसल्यास सुट्टी देण्यात येत असल्याचे आपटे यांनी सांगितले.
तंत्रशुद्ध शिक्षणाचा अभाव आणि “ट्रॅफीक’ची समस्या
पुण्यासारख्या गजबजलेल्या शहरांत चारचाकी शिकवताना वाढत्या वाहन संख्येमुळे अडचणी देखील वाढत आहेत. त्यामुळे सध्या ड्रायव्हिंग स्कूलसमोर “ट्रॅफीक’ हे मोठे आव्हान आहे. तर नागरिकांच्या वाहन चालविण्याच्या पद्धतीचे निरीक्षण केल्यास “बेसिक’चुका चालकांकडून होत असल्याचे निदर्शनास येते. अनेक जण नातेवाईक, मित्रमंडळी, सहकारी, चालक आदींकडून वाहन शिकतात. मात्र, ते तंत्रशुद्ध नसल्याने अशा वाहनचालकांच्या गंभीर चुका पुढे दिसतात, असे निरीक्षण आपटे यांनी नोंदविले.