नवी दिल्ली : करोनाचा प्रभाव वाढलेल्या 15 राज्ये आणि केंद्र शासीत प्रदेशातील 50 जिल्हे अथवा नगरपालिकांच्या क्षेत्रात करोनाच्या व्यवस्थापनासाठी केंद्रीय पथके पाठवण्यात येणार आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने मंगळवारी दिली. त्यात महाराष्ट्रात सात पथके येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
नेमक्या बाधितांची तपासणी, दशलक्ष लोकसंख्येमागच्या किमान चाचण्या, येत्या दोन महिन्यात बेडस् कमी पडण्याची शक्यता, वाढता मृत्यू दर यांबाबत ते राज्यांना मार्गदर्शन करतील, असे या आदेशात म्हटले आहे.
पथके पाठवणार असलेली राज्ये किंवा केंद्र शासीत प्रदेश : महाराष्ट्र (सात जिल्हे/नगरपालिका), तेलंगणा (चार), तमिळनाडू (सात), राजस्थान (पाच), आसाम(सहा), हरियाणा (चार), गुजरात (तीन), कर्नाटक (चार), उत्तराखंड (तीन), मध्य प्रदेश (पाच), प. बंगाल (तीन), दिल्ली (तीन), बिहार (चार), उत्तर प्रदेश (चार) आणि ओडिशा (पाच)
प्रतिबंधित क्षेत्रासाठी तांत्रिक सहकार्य देणे आणि करोना साथीला आटोक्यात आणणे यासाठी व्यवस्थापन करण्यात हे पथक मदत करेल, असे केंद्र सरकारने जाहीर केले आहे.
हे पथक तीन सदस्यीय असेल. त्यान दोन साथतज्ज्ञ/सार्वजनिक आरोग्य तज्ज्ञ/डॉक्टर आणि प्रशासकीय सुधारणेसाठी एक प्रसासकीय सेवेतील नोडल ऑफिसर यांचा समावेश आहे. प्रत्यक्ष कार्यस्थळावर ही पथके काम करतील. प्रतिबंधित उपाय योजनांसाठी ते मदत करतील.