नवी दिल्ली, दि. 17 (प्रतिनिधी) – केंद्र शासनाने 18 ते 44 या वयोगटातील लोकांना दिली जाणारी लसीची दुसरी खेप देण्यास नकार दिला आहे. सध्या, तीन दिवस पुरेल एवढाच साठा उरला आले, अशी माहिती दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी दिली.
उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी आज पत्रकारांना सांगितले की, दिल्लीत 18 ते 44 या वयोगटातील लोकांना दिली जाणाऱ्या व्हॅक्सीनचा साठा आता संपत आला आहे. पुढील दिवस पुरेल एवढाच साठा उरला आहे. केंद्र सरकारने या महिन्यात लसीचा आणखी पुरवठा करण्यास सपशेल नकार दिला आहे. केंद्र सरकारने याबाबत दिल्ली सरकारला पत्र लिहिले आहे.
मात्र, 45 आणि त्यापेक्षा जास्त वयोगटातील लोकांचे लसीकरण करण्यासाठी दिल्ली सरकारला चालू मे महिन्यात तीन लाख 83 हजार डोज दिले जाणार आहे. परंतु, 18 ते 44 या वयोगटासाठी कोणताही पुरवठा केला जाणार नाही.
दिल्ली सरकारने 18 ते 44 आणि 45 पेक्षा जास्त वयोगटातील लोकांसाठी लसीकरण मोहिम युध्दपातळीवर राबविली जात असल्याची माहिती केंद्र सरकारला पत्र लिहून दिली होती. आज सोमवारपासून दिल्लीच्या सरकारी शाळांमध्ये सुध्दा लसीकरणाची व्यवस्था करण्यात आली आहे. आतापर्यंत रूग्णालय आणि डिस्पेंसरीमध्ये लस दिली जात होती. शाळांमध्ये रजिस्ट्रेशन केले नसले तरी लस दिली जात आहे.
45 आणि अधिकच्या वयोगटातील लोकांना चार दिवस लस देता येईल एवढा साठा आहे. परंतु, 18 ते 44 या वयोगटातील लोकांसाठी दिलेली लस संपत आली आहे.
प्रमुख तीन मागण्या
दिल्ली सरकारने केंद्र सरकारला पत्र लिहून प्रमुख तीन मागण्या केल्या आहेत. यात 18 ते 44 या वयोगटासाठी लस उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. याशिवाय भारत बायोटेक आणि सिरम या दोन्ही कंपन्या किती व्हॅक्सीने उत्पादन करीत आहे आणि त्याच्या वितरणाचा डाटा सार्वजनिक करावा. जेणेकरून कोणत्या वयोगटातील किती लोकांचे लसीकरण केले गेले याची माहिती सहज उपलब्ध होईल.
दिल्लीतील सरकारी हॉस्पीटलला किती आणि खासगी रूग्णालयांना किती लस दिली जात आहे, याची माहिती सुध्दा ऑक्सीजनच्या आकडेवारीप्रमाणे सार्वजनिक होणे गरजेचे आहे. जून आणि जुलै महिन्यात किती लसीची पुरवठा करणार केला जाणार आहे हे केंद्राने सांगितले तर पुढची व्यवस्था करणे सोपे जाईल, असेही या पत्रात म्हटले आहे.