मुंबई – महाराष्ट्रात 2020 साली अतिवृष्टीमुळे जे नुकसान झाले होते, त्याबद्दल केंद्र सरकारच्यावतीने 700 कोटींची मदत मंजूर केली असल्याचे काल जाहीर करण्यात आले. 2020 च्या अतिवृष्टीत नुकसान झाले होते, त्यासाठी राज्याने केंद्राकडे 3 हजार 700 कोटींची मागणी केली होती.
मात्र केंद्र सरकारच्या पथकाने पाहणी केल्यानंतर 700 कोटींची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही मदत आणि यावर्षी महाराष्ट्रात आलेला पूर यांचा दुरान्वयानेही संबंध नसल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
यावर्षी पुरामुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज सध्या राज्य सरकार घेत आहे. सर्व पाहणी झाल्यानंतर राज्य सरकार एकूण नुकसानीचा आकडा ठरवेल आणि केंद्राकडे त्यानुसार मदत मागेल.
तसेच केंद्र सरकारचे पथक जर आताच पाहणी करण्यासाठी येत असेल तर आम्ही त्यांचे स्वागतच करु. गुजरातमध्ये केंद्राने नुकतीच एक हजार कोटींची मदत दिलेली आहे. त्यानुसार जर महाराष्ट्रालाही मदत केली तर चांगलेच होईल, असेही अजित पवार यावेळी म्हणाले.