नवी दिल्ली – केंद्र सरकारने कृषी विषयक तीन वादग्रस्त कायदे त्वरीत रद्द करावेत अन्यथा त्याची हरियानातील भाजप-जेजीपी पक्षाच्या सरकारला मोठी किंमत मोजावी लागेल असा इशारा जेजीपी म्हणजेच जननायक जनता पार्टी या पक्षाच्या आमदारांनी भाजपला दिला आहे.
जननायक जनता पार्टीने हरियाना सरकार मधून बाहेर पडण्याचे संकेत या आधीच दिले आहेत. तसे झाले तर हरियानातील खट्टर सरकार धोक्यात येऊ शकते. याच संबंधात मुख्यमंत्री खट्टर हे उपमुख्यमंत्री व जेजेपीचे नेते दुष्यंत चौताला यांना घेऊन गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहेत.
हरियानातील 90 जणांच्या विधानसभेत भाजपचे 40 आमदार आहेत. त्यांनी जेजेपी पक्षाच्या दहा आमदारांना घेऊन तेथे सरकार स्थापन केले आहे. केंद्र सरकारने हे कायदे मागे घेतले नाहींत तर राज्यातील सरकार टिकेल की नाही याची शाश्वती देता येत नाही असे जेजेपीचे आमदार रामकुमार गौतम यांनी म्हटले आहे.
सरकारचा पाठिंबा मागे घ्यावा म्हणून दुष्यंत चौताला यांच्यावर दबाव वाढत असून या आमदारांना एकत्र ठेवण्यासाठी आणि त्यांना शांत करण्यासाठी चौताला यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांची आपल्या फार्म हाऊसवर बैठक बोलावली आहे.
मुख्यमंत्री खट्टर यांच्यावर शेतकऱ्यांनी चांगलाच संताप व्यक्त केला असून हरियानातील शेतकऱ्यांनी त्यांची कर्नाल मतदार संघात होणाऱ्या सभेच्या ठिकाणी मोडतोड करून ही सभा हाणून पाडली होती. हिस्सार येथे चौतालांच्या हेलिपॅडचेही शेतकऱ्यांनी नुकसान केले होते.