कोल्हापूर: महापुरामुळे नुकसान झालेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील ठिकाणांची पाहणी आज केंद्रीय समितीच्या वतीने करण्यात आली. हे पथक सकाळी दहा वाजता कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यातील अर्जुनवाड परिसरात दाखल झाले. यानंतर शिरोळ, नृसिंहवाडी, भैरेवाडी, इचलकरंजी परिसर याठिकाणी पथकाने पाहणी केली.
यामध्ये प्रामुख्याने वाहून गेलेली शेतजमीन, पिकांचे झालेले नुकसान, महावितरणचे झालेले नुकसान, प्राथमिक आरोग्य केंद्र, दलित वस्तीत पडलेली घरं, यंत्रमागाच झालेले नुकसान, ऊस आणि सोयाबीन यासह इतर पिकांचे झालेले नुकसान याची पाहणी केली.
सायंकाळी पाच वाजता हे पथक कोल्हापूर शहरातील राजाराम बंधारा परिसरात दाखल झालं. या पथकाने संपूर्ण बंधाऱ्याची पाहणी करून ज्या पद्धतीने या बंधाऱ्याचे नुकसान झाले आहे, त्याच पद्धतीने जिल्ह्यातील 157 बंधाऱ्यांचे नुकसान झाले असल्याचा अहवाल सिंचन भवन च्या अधीक्षक अभियंता यांनी या समितीसमोर सादर केला. यानंतर या पथकाने कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यातील चिखली आंबेवाडी आणि त्यासोबतच कोल्हापूर शहरातील पूरग्रस्त भागाची पाहणी केली.