पुणे – केंद्र शासनामार्फत सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याकरिता 31 ऑक्टोबरपर्यंत मुदत आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने फेब्रुवारी-मार्च 2020 मध्ये घेतलेल्या इयत्ता बारावी परीक्षेत उच्चतम गुणवत्ताप्राप्त विद्यार्थ्यांना पदवी व पदव्युत्तर शिक्षणासाठी सेंट्रल सेक्टर शिष्यवृत्ती योजना राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्रासाठी 7 हजार 417 इतके संच निर्धारित केले आहे.
या योजनेच्या अंमलबजावणीची जबाबदारी संबंधित महाविद्यालय प्राचार्य, संस्थाप्रमुख यांची असणार आहे. अर्जदाराच्या सोयीसाठी मार्गदर्शक सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, अशा माहिती पुणे विभागीय उच्च शिक्षण सहसंचालक डॉ. मोहन खताळ यांनी दिली. योजनेचा लाभ घेण्यासाठी अटीही घालण्यात आल्या आहेत.
अर्जदार हा भारतीय नागरिक व महाराष्ट्र राज्याचा रहिवासी असावा, कोणत्याही शिष्यवृत्तीचा अथवा स्टायपेंडचा लाभार्थी नसावा, अर्जदाराच्या पालकांचे वार्षिक उत्पन्न आठ लाखांपेक्षा जास्त नसावे आदींचा समावेश आहे. कोणत्याही पदविका अभ्यासक्रम व पत्राद्वारे, दूरस्थ शिक्षणासाठी ही योजना लागू नाही, असेही स्पष्ट केले.