ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात 7 दिवस सेवा विस्कळीत
पुणे – गेल्या महिनाभरामध्ये हजारो चाकरमान्यांची “लाईफलाईन’ असणारी मध्य रेल्वेची वाहतूक सातत्याने विस्कळीत होत आहे. मात्र, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात सुमारे 7 दिवस विविध कारणांमुळे रेल्वेसेवा विस्कळीत झाली. यामुळे रेल्वेने विस्कळीत होण्याचा अनोखा “विक्रम’ केला आहे, अशी टिप्पणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे.
वाहून गेलेला भराव, मालगाडीचे कोसळलेले डबे, वारंवार घाट परिसरामध्ये कोसळणारी दरड, रेल्वे मार्ग दुरुस्तीसाठी घेण्यात आलेला ब्लॉक, लोहमार्गावर साचलेले पाणी आणि पाऊस यामुळे जून ते ऑगस्ट या 2 महिन्यांत चारपेक्षा अधिकवेळा गंभीर कारणांनी पुणे ते मुंबई मार्गावरील रेल्वेसेवा विस्कळीत झाली आहे. यामुळे लाखो प्रवाशांचा खोळंबा झाला. मागील महिनाभरात सलग 3 दिवस रेल्वे वाहतूक विस्कळीत होण्याची ही तिसरी वेळ आहे. मुंबईतील पाऊस आणि दरड कोसळल्याने रेल्वे रद्द होण्याचे प्रमाण वाढत आहे.
यामुळे झाली रेल्वे सेवा विस्कळीत
दि. 29, 30 जून रोजी झालेली मुंबईतील अतिवृष्टी
दि. 1 ते 4 जुलैदरम्यान जामरुंग ते ठाकूरवाडी स्थानकादरम्यान मालगाडीचे डबे घसरले
दि. 8 जुलै रोजी कर्जत परिसरात दरड कोसळली
दि. 27 ते 29 जुलैदरम्यान रेल्वे मार्गावर पाणी साचले
दि. 30 जुलै पळसदरी स्थानकादरम्यान दरड कोसळली
दि. 2 ते 8 ऑगस्ट संततधार पाऊस