पुणे – मध्य रेल्वेने लॉकडाऊन आणि अनलॉकमध्ये सुमारे 61 हजारांहून अधिक टनांची वाहतूक केली. यामध्ये नाशवंत वस्तू, औषधे, फार्मा उत्पादने, खाद्यपदार्थ आदींचा समावेश आहे.
मार्चपासून रेल्वेची प्रवासी सेवा स्थगित केली होती. या कालावधीत जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा करण्यासाठी मालगाड्या आणि पार्सल गाड्या सोडण्यात येत होत्या. मध्य रेल्वेच्या पुणे, मुंबई, नागपोरा, भुसावळ आणि सोलापूर या विभागांतर्गत या गाड्या सोडण्यात येत होत्या.
किसान रेल्वेने आतापर्यंत 10 फेऱ्या पूर्ण केल्या असून, त्याद्वारे 2 हजार हून अधिक टन डाळिंब, हिरवी मिरची, आले आदींसह नाशवंत पदार्थांची वाहतूक केली. मध्य रेल्वेने आतापर्यंत एकूण 61 हजार 978 टन पार्सलची वाहतूक केली.
पार्सल गाड्यांद्वारे 38 हजार 618 टन, तर 19 हजार 290 टन पार्सल व्हॅन, 1 हजार 804 टन दूध टॅंकरद्वारे आणि किसान रेल्वेतून 2 हजार 266 टन वाहतूक केली, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.