‘एक देश एक कृषी’वर ज्येष्ठ नेते डॉ. बाबा आढाव यांची टीका
पुणे – शेतकऱ्यांना आत्मनिर्भर बनविण्याचे सांगत बाजार समित्यांच्या बाहेरही मुक्तपणे शेतीमाल विक्रीची मुभा देणारा केंद्र सरकारने काढलेला अध्यादेश हा शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणारा आहे. त्यामुळे शेतकरी आत्मनिर्भर तर सोडा स्वयंपूर्णही होणार नाही, अशी टिका ज्येष्ठ कामगार नेते डॉ. बाबा आढाव यांनी केली.
शेतकऱ्यांना आपला शेतीमाल देशात कोठेही विकता यावा. यासाठी केंद्र सरकारने द फर्मिंग प्रोड्यूस ट्रेड अँड कॉमर्स अध्यादेश, फार्मर्स (इम्पावरमेंट अँड प्रोटेक्शन) ऍग्रीमेंट ऑन प्राइस ऍशुरन्स अँड फार्म सर्व्हिसेस ऑर्डिनन्सला मंजुरी दिली आहे. त्यापर्श्वभूमीवर डॉ. आढाव बोलत होते.
सरकारने हा निर्णय घेण्यापूर्वी शेतकरी, शेतकरी प्रतिनिधी तसेच शेतकरी तज्ञ यांच्याशी चर्चा करणे अपेक्षित होते. शेतकरी स्वतः माल पिकवणार की स्वतः रस्त्यावर येऊन विकणार. याखेरीज, ज्याला कोणाला तो शेतीमाल देणार त्याच्यांकडून पैशाची शाश्वतीही नाही. शेतकऱ्याने शेतीमाल विकला तर जबाबदारी कोण घेणार, असा सवालही त्यांनी केला आहे.