मुंबई : देशात सध्या करोनाचा विस्फोट झालेला पाहायला मिळत आहे. त्यातच केंद्र सरकारकडून लसीकरणासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. करोनातून बरे झाल्यानंतर नागरिकांनी तीन महिन्यांनंतर करोनाची लस घ्यायची आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी दिली आहे. केंद्र सरकारने सांगितले की, संक्रमित आढळलेल्यांच्या लसीकरणात तीन महिन्यांचा विलंब होईल. त्यात ‘बूस्टर’ डोसचा देखील समावेश आहे.
सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवलेल्या पत्रात, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव विकास शील यांनी म्हटले आहे की, “कोविड -19 संसर्गाची चाचणी पॉझिटिव्ह आढळलेल्या नागरिकांना आता तीन महिन्यांनी बरे झाल्यानंतर डोस देण्यात येईल.” यामध्ये बूस्टर डोसचा देखील समावेश आहे. शील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना याची दखल घेण्याची विनंती केली आहे.
करोनाचे ओमायक्रॉन व्हेरियंट आल्यानंतर देशात पुन्हा एकदा लसीकरणाला वेग आला आहे. या विषाणूपासून बचाव करण्यासाठी सरकारकडून अनेक माध्यमातून जनजागृती केली जात आहे. अशा परिस्थितीत लोकांच्या मनात लसीकरणाबाबत अनेक प्रश्नही उपस्थित होत आहेत.
लस मिळाल्यानंतर किंवा करोना विषाणूपासून बरे झाल्यानंतर शरीरात किती महिने प्रतिकारशक्ती म्हणजेच अँटीबॉडी अबाधित राहते, याबाबत लोकांचे अनेक प्रश्न आहेत. आयसीएमआरचे डीजी बलराम भार्गव यांनी लोकांच्या मनात निर्माण झालेल्या प्रश्नाबाबत माहिती दिली आहे.
बलराम भार्गव यांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाबाधित रुग्ण बरा झाल्यानंतर किंवा लसीचे दोन्ही डोस घेतल्यानंतर सुमारे नऊ महिने अँटीबॉडी असते. आयसीएमआरच्या डीजी बलराम भार्गव यांच्या म्हणण्यानुसार, लसीपासून मिळालेल्या प्रतिकारशक्तीवर भारतात एक अभ्यास झाला आणि जागतिक स्तरावरही संशोधन झाले. या अभ्यासातून हे स्पष्ट झाले आहे की अँटीबॉडी शरीरात सुमारे नऊ महिने टिकते.