“करोना’च्या पार्श्वभूमीवर केंद्र शासनाचे निर्देश
पुणे – भारतातही करोना विषाणुचा प्रादुर्भाव वाढायला लागला असून, आतापर्यंत करोनाचे 31 रुग्ण आढळून आले आहेत. या विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये, यासाठी गर्दी होणारे सामाजिक कार्यक्रम पुढे ढकल्याचे निर्देश केंद्र शासनाने दिले आहेत. ही माहिती राज्य आरोग्य विभागाने दिली आहे.
मागील आठ दिवसांपासून देशात काही ठिकाणी करोना रुग्ण आढळले आहेत. विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत एकही रुग्ण आढळलेला नाही.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आतापर्यंत 83 हजार 516 प्रवासी तपासण्यात आले आहेत. तर, पुणे आणि नागपूर विमानतळावर स्क्रिनिंग सुरू झाले आहे. करोनाबाधित भागांतून राज्यात आतापर्यंत 516 प्रवासी आले आहेत. त्यातील 229 जणांना ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळून आल्यामुळे वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात भरती करण्यात आले आहे. त्यापैकी 204 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत.
डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विकू नये
करोना विषाणूमुळे मास्कला मागणी वाढलेली आहे. मात्र, त्याचा फायदा काही व्यावसायिक घेत असून, “मास्कचा तुटवडा आहे,’ असे सांगून चढ्या भावाने विक्री करत असल्याच्या तक्रारी आल्या आहेत. काही व्यावसायिकांकडून मास्कची साठेबाजी होऊ शकते. त्या पार्श्वभूमीवर डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मास्क विकू नयेत, असे निर्देश अन्न व औषध प्रशासन विभागाने दिले आहेत.
अफवा पसरवू नका
करोना संदर्भात अर्धवट माहिती असणारे, चुकीचे, भीती उत्पन्न करणारे संदेश कोणीही सोशल मीडियावर पाठवू नयेत. विविध अधिकृत स्रोतांकडून खात्री करून घेतल्याशिवाय असे संदेश पुढे पाठवू नयेत. आवश्यक असल्यास हेल्पलाइनला फोन करुन शंका निरसन करून घ्यावे. सर्दी, ताप, खोकला या लक्षणांनुसार रुग्णांवर उपचार केले जात असून, सर्वांनी रोगप्रतिकार शक्ती वाढण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले जात आहे.