नवी दिल्ली -देशावर कोसळलेल्या वैद्यकीय आपत्तीला केवळ भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार जबाबदार आहे. त्यामुळे पश्चिम बंगालच्या जनतेने मतदान करताना संपूर्ण देशाच्या वतीने बोलावे. देशाच्या आशा बंगाली मतदारांच्या हाती आहेत, असे कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते पी.चिदंबरम यांनी म्हटले आहे.
बंगाल विधानसभा निवडणुकीतील सहाव्या टप्प्यासाठी उद्या (गुरूवार) मतदान होणार आहे. त्याचा संदर्भ घेऊन चिदंबरम यांनी मोदी सरकार आणि भाजपला लक्ष्य करणारे ट्विट केले. बंगाली मतदारांना निवडणुकीमुळे केंद्र सरकारला जबाबदार धरण्याची संधी मिळाली आहे, असे म्हणत त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री हर्ष वर्धन आणि रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या दाव्यांची खिल्ली उडवली.
करोनावरील लसींचा तुटवडा नसल्याचे आरोग्य मंत्री म्हणतात. त्यांच्यावर विश्वास ठेवा. केवळ रूग्णांचा तुटवडा आहे. लस हवी असणाऱ्या रूग्णांकडून अर्ज मागवणारी जाहिरात केंद्र सरकार जारी करेल. रेल्वे स्थानकांवर गर्दी नसल्याचे रेल्वेमंत्री सांगतात. त्यांच्यावरही विश्वास ठेवा. रेल्वे स्थानकांवर लांबच लांब रांगा असल्याचे टीव्ही वाहिन्या दाखवतात. ती गर्दी केवळ स्थानकांवर पहारा देण्यासाठी रेल्वे पोलिसांना मदत करण्याच्या उद्देशातून झाली आहे, अशी उपहासात्मक टिप्पणी चिदंबरम यांनी केली.