राजगुरूनगर – खेड तालुक्यातील मुंबई – भिमाशंकर राष्ट्रीय महामार्गाला केंद्र सरकारने हिरवा कंदिल दाखवल्याने खेडच्या पश्चिम आदिवासी भागातील जनतेला रोजगाराच्या संधीबरोबरच मुंबईला जाण्यासाठी जवळचा आणि सोयीचा महामार्ग उपलब्ध होणार आहे.
खेड तालुक्यातील कर्जत-भिमाशंकर जोडमार्ग होण्यासाठी या भागातील नागरिकांची गेली ५० वर्षापासून मागणी होती. हा रस्ता लागण्यासाठी २० वर्षांपूर्वी संघर्ष समिती स्थापन झाली त्याद्वारे संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष किसनराव गोपाळे यांच्यापुढाकारातून तालुक्यातील पश्चिम भागातील नागरिकांनी लढा उभारला होता. गेल्या २० वर्षापासून सातत्याने आंदोलने, मोर्चे निवेदने राज्यसरकाराकडे दिली जात होती.तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुखांना हा रस्ता होण्यासाठी एक लाख नागरीकांच्या सह्याचे निवेदन देण्यात आले होते.
हा रस्ता होण्यासाठी कर्जत ते भिमाशंकर पदयात्रा, साखळी उपोषण करीत विविध मार्गाने आंदोलन छेडले होते. वेळोवेळी या रस्त्याबाबत मंत्रालयात बैठका लावुन यावर सातत्याने आवाज उठवला होता कर्जत महामार्गावर माजी आमदार स्वर्गीय सुरेश गोरे यांनी पर्यटन विकासाला गती देण्याबरोबरच पढरवाडी वांद्रा येथे कच्या रस्त्यासह मोरी काम करण्यात आले होते.
कर्जत ते भिमाशंकर हा राष्ट्रीय महामार्गासाठी संसदेच्या हिवाळी अधिवेशनात खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन कर्जत भिमाशंकर मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा देण्याचे निवेदन दिले. या रस्त्याला महामार्गाला केंद्राची परवानगी मिळाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयाने खासदार डॉ. कोल्हे यांना दिली.
कर्जत भिमाशंकर महामार्गामुळे खेड तालुक्याच्या पश्चिम भागात पर्यटकांना भाविकांना जवळचा आणि सोयीचा होणार आहे. यामुळे पश्चिम भागातील सह्याद्री च्या डोगंररांगेत निसर्ग पर्यटनाला मोठी चालना मिळणार आहे .त्याचबरोबर उत्तर पुणे जिल्ह्यातील आंबेगाव,खेड आणि मावळ तालुक्यातील जनतेला हा मार्ग वरदान ठरणार आहे.
खेड तालुक्यातील कर्जत – भिमाशंकर जोडरस्ता संघर्ष समितीचे किसनराव गोपाळे यांच्या पुढाकाराने गेली २० वर्ष सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे अखेर त्यांच्या प्रयत्नाला मोठे यश मिळाले आहे.कर्जत भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गाला हिरवा कंदील मिळाल्याने पश्चिम भागातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
कर्जत भीमाशंकर रस्ता संघर्ष समितीचे अध्यक्ष किसनराव गोपाळे यांनी सांगितले, खेड तालुक्याच्या पश्चिम भाग आणि भीमाशंकर ला जोडण्यासाठी कर्जत भीमाशंकर रस्ता होण्यासाठी गेली वीस वर्षाच्या संघर्षाला केंद्राने हिरवा कंदील दाखवल्याने यश आले आहे. हा राष्ट्रीय महामार्ग झाल्यास खेड तालुक्याच्या पश्चिम भागाचा मोठा विकास होणार आहे पर्यटनाच्या संधी उपलब्ध होतील, ज्योतिर्लिंग भीमाशंकरला जाण्यासाठी खेड तालुक्यातून रस्ता होईल.
मुबई ते भीमाशंकर हे अंतर सुमारे ७० किलोमीटरने कमी होणार आहे. जवळचा आणि पर्यायी मार्ग म्हणून मुंबई- कर्जत -भीमाशंकर राष्ट्रीय मार्ग होणार असल्याने त्यासाठी पाठपुरावा करणारे खासदार डॉ अमोल कोल्हे यांचे जनतेच्या वतीने आभार व्यक्त करतो.