नवी दिल्ली – केंद्र सरकारने ताप, सर्दी, डोकेदुखी यांसारख्या आजारांवरील उपचारामध्ये वापरल्या जाणाऱ्या 14 औषधांवर बंदी घातली आहे. केंद्र सरकारने आरोग्यास धोका निर्माण करणाऱ्या औषधांवर बंदी घालण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. डीसीजीआय म्हणजेच भारतीय औषध नियामक मंडळाने या औषधांवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
यासंदर्भात तज्ज्ञ समितीने गेल्या वर्षी केंद्र सरकारकडे अहवाल दिला होता. यामध्ये 14 औषधांच्या उपचारांचा परिणाम आणि उपयुक्तता याबाबत स्पष्टता नसल्याचे सांगितले होते. ही औषधे धोकादायक ठरू शकतात, असे सांगत तज्ज्ञ समितीने यावर बंदी घालण्याची मागणी केली होती.
आता केंद्र सरकारने 3 जून रोजी आरोग्यासाठी धोकादायक ठरणाऱ्या 14 फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधांवर बंदी घातली आहे. तज्ज्ञ समितीच्या अहवाल दिल्यानंतर सरकारने हे मोठे पाऊल उचलले आहे. एका गोळी किंवा औषधामध्ये एकापेक्षा जास्त घटक एकत्र असल्यास, अशा औषधांना फिक्स्ड-डोस कॉम्बिनेशन औषधे म्हणतात. या औषधांना कॉकटेल औषधे असेही म्हटले जाते.