विचारधारेवर हल्ला करणाऱ्या चित्रपटांना जावडेकरांच्या समितीने डावलले
मुंबई : मुंबई आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सत्ताधारी सरकारवर टीका करणाऱ्या चित्रपटांना वगळण्यात आल्याचा आक्षेप आनंद पटवर्धन यांच्यासह प्रख्यात चित्रपट निर्मात्यांनी केला आहे. माहिती प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारितील फिल्म डिव्हिजनच्यावतीने या महोत्सवाला आजपासून सुरवात झाली. पटवर्धन यांच्यासह पंकज हृषीकुमार आणि प्रदीप केपी यांनी हे आरोप केले.
ते म्हणाले, प्रसारणमंत्री जावडेकर यांनी चित्रपट निवडण्यासाठी संस्कारी समिती नियुक्त केली होती. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, या महोत्सवासाठी चित्रपट निवडण्याच्या प्रक्रियेत फिल्म डिव्हिजनचा सहभाग नव्हता. ही निवड समिती जावडेकर यांनी निवडली. त्यांना मुंईतील एका हॉटेलमध्ये महिनाभर ठेवले.
“राम के नाम’ या त्यांच्या डॉक्युमेंटरीबद्दल बोलताना ते म्हणाले, फिल्म डिव्हीजनच्या प्राथमिक फेरीत ही फिल्म निवडली गेली होती. मात्र त्यानंतर मुंबईतील केंद्रीय समितीने या फिल्मला वगळले. ही सर्व संपूर्ण प्रक्रियाच बदलली गेली, असे पटवर्धन म्हणाले.
सध्याच्या काळातील राजकीय तत्वज्ञानावर भाष्य करणारी त्यांची “विवेक’ ही डॉक्युमेंटरी नाकारण्यात आली. नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे, एम. एम. कलबुर्गी आणि गौरी लंकेश यांच्या हत्यांचा काही सनातनी संस्थाशी असणारा संबंध यांचा वेध यात घेण्यात आला होता.
भारतात होणाऱ्या “हॉनर किलींग’वर भाष्य करणारी फिल्म नाकारल्याने पॉंडेचरीतील नाट्यकर्मी नाराज झाले. गौरी लंकेश यांच्या जीवनावरील “आमची गौरी’, जेएनयुचा 2016पासून बेपत्ता असणारा विद्यार्थी नजीब याच्यावरील
“अम्मी या अन्या ‘नकारलेल्या फिल्म आहेत.
या महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांच्या यादीत सरकारच्या विचारधारेवर आघात करणारी एकही फिल्म नाही. ही निवड म्हणजे सिनेमावरील सरकरी हल्ला आहे अशी टीका पटवर्धन यांनी केली.