आळंदी – वाहणारे काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त सांडपाणी त्या पाण्यावर तरंगणारा रसायनयुक्त फेस हे वर्णन कुठल्या गटारीचे नाहीत तर संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले तीर्थक्षेत्र आळंदी येथील पवित्र अश्या इंद्रायणी नदीचे आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतून तसेच इंद्रायणी नदी काठच्या गावातून, कारखान्यातून, कंपन्यांतून कोणतीही प्रक्रिया न करता इंद्रायणी नदीत मैलामिश्रित रसायनयुक्त सांडपाणी सोडत असल्याने पवित्र इंद्रायणीची ही अवस्था झाली आहे.
गेली दोन दिवसांपासून आळंदी येथील नदीपात्र मोठ्या प्रमाणात रसायनयुक्त सांड पाण्यामुळे फेसाळले आहे. हे तरंगणारे फेस पाहून बर्फाच्छादित भागाची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणात येथील नदीपात्र रसायनयुक्त सांडपाण्यामुळे फेसाळलेले आहे. नदी पात्रातील मैलामिश्रित रसायनयुक्त पाण्याने जलचर जीव सृष्टी धोक्यात आली आहे. तसे भाविकांसह स्थानिकांचे आरोग्यही धोक्यात आले आहे. शेतीतील पिकांना देखील या पाण्याचा मोठा फटका बसत आहे.
आळंदी हे तीर्थक्षेत्र आहे. संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या संजीवन समाधी सोहळा, कार्तिकी एकादशी, आषाढी एकादशी, तसेच महिन्यांच्या एकादशीवेळी राज्यभरातून लाखो भाविक माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला येतात तेंव्हा तीर्थ म्हणून हेच पाणी प्राशन करतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकार, स्थानिक प्रशासन सर्वजण इंद्रायणी प्रदुषणमुक्त करण्यात अपयशी ठरले आहेत.
इंद्रायणी प्रदुषित झाली आहे. रसायनमिश्रीत पाण्यामुळे पवित्र तीर्थातील पाणी फेसाळले आहे. याबाबत माहिती देताना धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे प्रदेशाध्यक्ष अक्षय महाराज भोसले यांनी सांगितले की, इंद्रायणीत पिंपरी चिंचवड हद्दीतील कंपन्यांचे, तसेच सांडपाणी सोडले जाते यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरून संपर्क झाला आहे. यासंदर्भात त्यांना माहिती देण्यात आली असून इंद्रायणी स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न केले जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे. मी या दुषित पाण्याबाबत सर्वेक्षण करत असून लवकरच याबाबतचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर केला जाणार आहे.