नवी दिल्ली : कोरोनाला रोखण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली राज्य सरकार प्रभावीपणे उपाययोजना करत आहे. दरम्यान, राज्य सरकार हे करत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना राज्यातील स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. केंद्राचा हा निर्णय म्हणजे राज्य सरकारवर कुरघोडी करण्याचा प्रयत्न असल्याचे म्हटले जात आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी यासंदर्भात पत्रक प्रसिद्धीला दिले आहे. त्यानुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना राज्यातील करोना स्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले. आजारावर मात करण्यासाठी केंद्र सरकारने दिलेल्या निर्देशांचे पालन होते किंवा नाही तसेच केंद्राकडून अधिक मदतीची गरज आहे काय, याबाबत राज्यातील विविध जिल्ह्य़ांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून खात्री करून घ्यावी, असे गडकरींना सांगण्यात आले आहे. पंतप्रधानांच्या निर्देशानुसार गडकरी यांनी राज्यातील १७ जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधला व करोनामुळे देशभरात उद्भवलेली समस्या सोडवण्यासाठी केंद्र सरकार जनतेच्या व अधिकाऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा संदेश दिला.
राज्यातील संपूर्ण यंत्रणा उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात करोनावर मात करण्यासाठी मागील दोन आठवडय़ांपासून दिवसरात्र प्रयत्न करीत आहे. खुद्द ठाकरे यांचे पंतप्रधानांशी वेळोवेळी दूरध्वनीवरून बोलणेही झाले आहे. असे असताना मोदी यांनी राज्य सरकारच्या मदतीने केंद्राच्या उपाययोजनांचा आढावा घेण्याऐवजी गडकरी यांच्याकडे ही जबाबदारी सोपवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकप्रकारे राज्यसरकारला बाजूला सारून केंद्रच करोनाच्या उपायोजना राबवत आहे, हे दाखवण्याचा प्रयत्न असल्याचे यातून स्पष्ट होत आहे.