कोलकाता, दि. 7 – बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराची माहिती घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाचे चार सदस्यांचे एक पथक पश्चिम बंगालमध्ये गेले असून त्यांनी आज राज्यपाल जगदीप धनकर यांची भेट घेऊन त्यांच्याकडून राज्यातील स्थिती जाणून घेतली.
हे पथक गुरुवारी राज्यात आले आहे. राज्याचे गृह सचिव, पोलिस महासंचालक आणि अन्य सचिवांचीही त्यांनी भेट घेतली. बंगाल मध्ये 2 मे रोजी निवडणुकीचे निकाल जाहीर झाले त्यानंतर राज्याच्या विविध भागात हिंसाचार सुरू झाला आहे. तृणमुलचे कार्यकर्ते भाजपवर हल्ला करीत आहेत असा आरोप केला जात आहे तर भाजपचेच लोक हिंसाचार माजवत आहेत असा आरोप तृणमूलच्या नेत्यांनी केला आहे.
राज्याच्या विविध भागातील हिंसाचारात 16 जणांचा मृत्यू झाला आहे. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी या संबंधात म्हटले आहे की ज्या भागात भाजपचे आमदार जिंकले आहेत त्याच भागात हा हिंसाचार प्रामुख्याने होत र्आहे.