असंघटित कामगार कॉंग्रेसतर्फे विविध मागण्यांसाठी प्रांताधिकाऱ्यांना निवेदन
संगमनेर -केंद्रातील भाजप सरकार खोटारडे सरकार आहे. कॉंग्रेसने कायम गोरगरिबांच्या हिताचे निर्णय घेतले असून गोरगरिबांना विकासाच्या वाटेवर आणणारा विचार कॉंग्रेस करीत आहे. केंद्राच्या चुकीच्या धोरणांमुळे या गोरगरीबांची आणखी हाल होत आहे. केंद्राने चुकीचे धोरणे थांबवले नाही तर देशातील सामान्य माणूस पेटून उठेल आणि याला जबाबदार फक्त केंद्र सरकार असेल, असा इशारा असंघटित कामगार कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय कोल्हे यांनी दिला.
अखिल भारतीय असंघटित कामगार कॉंग्रेसच्या वतीने सोमवारी कामगारांच्या हक्कासाठी संसद भवन दिल्ली येथे घेराव घालण्यात आला. या आंदोलनाच्या समर्थनार्थ महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे व इंद्रजीत थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा असंघटित कामगार कॉंग्रेसच्या वतीने जिल्हाधिकारी व प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
यावेळी संजय कोल्हे, तालुकाध्यक्ष जयराम ढेरंगे, डॉ.बाबासाहेब दिघे, बाळासाहेब कोल्हे, बाळकृष्ण गांडाळ, बबन खेमनर आदींनी हे निवेदन प्रांताधिकारी डॉ.शशिकांत मंगरुळे यांना दिले. अखिल भारतीय कॉंग्रेसच्या वतीने विविध मागण्यांसाठी खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दिल्ली येथे संसद भवनला घेराव घालण्यात आला.
त्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशात कॉंग्रेसचे राष्ट्रीय चेअरमन अरबिंदसिंह, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रीय रिजनल कॉर्डिनेटर मुकेश डागर, असंघटित कामगार कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मोहम्मद बद्रूजमा यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण राज्यामध्ये विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहे .