मुंबई : राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामातील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयावर आक्षेप घेतला आहे. देशातील गोरगरीब अन्नासाठी संघर्ष करत असल्याने केंद्राने निर्णयावर पुनर्विचार करावा, अशी विनंती सुळे यांनी केली आहे.
केंद्र सरकारने फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोडाऊनमधील बफर स्टॉकच्या तांदळापासून सॅनिटायजर तयार करण्याचा निर्णय घेतला आहे. सॅनिटायजर आवश्यक आहे, त्याचे उत्पादन करायलाच हवे. परंतु कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव झाल्याने उद्भवलेल्या परिस्थितीत देशातील गोरगरीब एकीकडे अन्नासाठी संघर्ष करत आहेत, याकडे सुप्रिया सुळे यांनी ट्विटरच्या माध्यमातून केंद्र सरकारचे लक्ष वेधले आहे.
या काळात आपले सर्वांचे प्राधान्य गरीबांचे पोट भरण्यास असायला हवे. आपण हा तांदूळ स्थलांतरीत मजूरांसाठी देऊ शकतो. आपणास विनंती आहे की, या निर्णयाचा कृपया पुनर्विचार करुन तो तांदूळ गरीबांना वाटण्यासाठी उपलब्ध करावा, अशी मागणीही सुप्रिया सुळे यांनी केली आहे. या ट्वीटमध्ये सुळे यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या ट्विटर हॅंडलला टॅग केले आहे.