जालना – केंद्र सरकारने महाराष्ट्रातील गरीबांसाठी करोनाची लस मोफत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. आज येथे ते वार्ताहरांशी बोलत होते. केंद्राने जर मोफत लस दिली नाही तर राज्य सरकार गरीबांना ही लस मोफत देणार काय असे विचारता ते म्हणाले की, आम्ही गरीबांना वाऱ्यावर सोडणार नाहीं.
ते म्हणाले की आरोग्य कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्कर्ससाठी ही लस मोफत पुरवली जाईल अशी घोषणा केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी केल्याची माहिती आपण नुकतीच ऐकली. पण त्यांनी गरीबांनाही ही लस मोफत उपलब्ध करून द्यावी अशी मागणी आम्ही करीत आहोत. जालन्यात कोविड लसीच्या ड्राय रन चा कार्यक्रम आज झाला. त्याच्या पहाणीसाठी टोपे येथे आले होते.
आज दिवसभरात राज्यातील चार जिल्ह्यांमध्ये या लसीचा ड्राय रन घेण्यात आला. टोपे म्हणाले की केंद्र सरकारने गेल्या सप्टेंबर महिन्यापासून महाराष्ट्राला कोविड संबंधातील कोणतीही मदत देणे थांबवले आहे.
तरीपण आम्ही या संबंधातील आरोग्य सेवा पुरवण्यात कोठेही कमी पडलो नाही असेही टोपे यांनी स्पष्ट केले. ड्राय रनच्या संबंधात सर्व राज्य सरकारांना ज्या सुचना करण्यात आल्या होत्या त्यानुसार आम्ही प्रत्यक्ष प्रात्यक्षिक पार पाडले असून ते यशस्वी झाले असल्याचा दावाहीं टोपे यांनी केला.