जयपुर – देशाने गेल्या 70 वर्षात जे काम उभे केले त्या मालमत्ता आता केंद्र सरकारने कवडी मोल दराने विकायला काढल्या आहेत. या सरकारने सध्या अडचणीत आलेल्या गरीब आणि मध्यमवर्गीयांना मदत करण्याचे काम करायचे सोडून हा भलताच मार्ग अवलंबला आहे.
त्यातून देश पुर्ण मोडकळीला येण्याचा धोका आहे असे राजस्थानातील कॉंग्रेस नेते सचिन पायलट यांनी म्हटले र्आहे. भाजपचे सरकार विभाजनवादी राजकारण करून लोकांची सर्वच बाबतीत पद्धतशीर दिशाभुल करीत आहे असा आरोपही त्यांनी केला आहे.
त्यांनी म्हटले आहे की केंद्र सरकारने नव्या मॉनिटायझेशन पॉलित देशातील रेल्वे, विमानतळ, रस्ते, स्टेडियम अशा सर्व मालमत्ता कवडी मोल किंमतीने विकायला काढल्या असून त्या मालमत्ता त्यांच्या मर्जीतील काही मोजक्याच लोकांच्या ताब्यात जाणार आहेत.
देशात महागाई व इंधन दरवाढ तसेच बेरोजगारी शिखरावर पोहोचलेली असताना हे लोक जनआर्शिवाद यात्रा काढत आहेत याचीही त्यांनी खिल्ली उडवली आहे. राजस्थानात सध्या सहा जिल्ह्यांच्या जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू असून त्यासाठी दौसा येथे घेतलेल्या जाहीर सभेत त्यांनी ही टीका केली.