नवी दिल्ली- कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली आज राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या (एनसीएमसी) बैठकीत संबंधित राज्ये आणि केंद्रीय मंत्रालयांसमवेत अम्फान चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या ओडिशा आणि पश्चिम बंगालमधील प्रभावित भागातील परिस्थितीचा आढावा घेण्यात आला.
हवामानशास्त्र विभागाने वेळेवर आणि अचूक वर्तवलेला अंदाज आणि एनडीआरएफच्या तुकड्या आधीच तैनात करण्यात आल्यामुळे पश्चिम बंगालमधील सुमारे 5 लाख लोक आणि ओडिशातील सुमारे 2 लाख लोकांची सुखरूप सुटका करण्यात मदत झाली. 1999 मध्ये ओडिशात मोठ्या प्रमाणावर विनाश करणाऱ्या सुपर चक्रीवादळाच्या खालोखाल अम्फान चक्रीवादळाची तीव्रता होती हे लक्षात घेतले तर अम्फानमुळे कमीत कमी जीवितहानी झाली आहे.
एनडीआरएफ पश्चिम बंगालमध्ये विशेषत: कोलकातामध्ये स्थिती पूर्ववत करण्याच्या कामाला गती देण्यासाठी अतिरिक्त तुकड्या तैनात करत आहे. भारतीय अन्न महामंडळ पश्चिम बंगालमध्ये अन्नधान्य, विशेषत: तांदळाची पुरेशी उपलब्धता देखील सुनिश्चित करेल. जेणेकरून अडकलेल्या लोकांना त्वरित अन्न पुरवता येईल.
ऊर्जा मंत्रालय आणि दूरसंचार विभाग हे दोन्ही राज्यांमधील सेवा पूर्ववत सुरू करण्यात मदत करेल. पायाभूत सुविधांचे मोठे नुकसान झालेल्या रेल्वेने लवकरात लवकर आपले कामकाज सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
चक्रीवादळ प्रभावित भागात शेती, वीज आणि दूरसंचार सुविधांचे मोठे नुकसान झाल्याची माहिती पश्चिम बंगालने दिली. ओडिशाने माहिती दिली की नुकसान प्रामुख्याने शेतीपुरते मर्यादित आहे.
केंद्रीय मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी ओडिशा आणि पश्चिम बंगाल राज्य सरकारांच्या संपर्कात राहावे आणि आवश्यक ती मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी. गृह मंत्रालय नुकसानीचे त्वरित पंचनामे करण्यासाठी पथके पाठवणार असून ते अहवाल सादर करतील, असे निर्देश कॅबिनेट सचिवांनी दिले आहेत.
पश्चिम बंगाल आणि ओडिशाच्या मुख्य सचिवांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे एनसीएमसी बैठकीत भाग घेतला. गृह, संरक्षण, सागरी वाहतूक, विमान वाहतूक, रेल्वे, पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू, ऊर्जा, दूरसंचार, स्टील, पेयजल आणि स्वच्छता, आरोग्य मंत्रालय तसेच आयएमडी, एनडीएमए आणि एनडीआरएफचे वरिष्ठ अधिकारीही या बैठकीला उपस्थित होते.