जलपैगुडी – आंध्रप्रदेशच्या मुख्य सचिवांची निवडणूक आयोगाकडून झालेली बदली म्हणजे राज्याच्या कामात केंद्र सरकारने निवडणूक आयोगाच्या माध्यमातून केलेला हस्तक्षेप आहे असा आरोप तृणमुल कॉंग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी केला आहे. अगदी शेवटच्या क्षणी बदल्या करण्याची इतकीच हौस मोदींना असेल तर ते स्वताचा कॅबिनेट सेक्रेटरी का बदलत नाहींत किंवा गृह सचिवांना ते का बदलत नाहीत असा सवाल त्यांनी केला आहे.
आज येथे निवडणूक प्रचार सभेत बोलताना त्यांनी मोदींना सवाल केला की आंधप्रदेशच्या मुख्य सचिवांना बदलण्याचे कारण काय? राज्यांच्या अंतर्गत कारभारात ते इतक्या खालच्या पातळीवर जाऊन हस्तक्षेप का करीत आहेत?.गेल्या शुक्रवारी निवडणूक आयोगाने आंध्रप्रदेशचे मुख्य सचिव अनिल चंद्र पुनेथा यांची अचानक बदली केली आणि त्यांच्या जागी वरीष्ठ आयएएस अधिकारी एलव्ही सुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली. तसेच पश्चिम बंगाल मधीलही काही पोलिस अधिकाऱ्यांच्या निवडणूक आयोगाकडून बदल्या करण्यात आल्या. त्याचा निषेध करणारे निवेदन ममता बॅनर्जी यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे. श्रद्धा, नारदा चीटफंड घोटाळ्यातील आरोपी असलेले मुकुल रॉय भाजपला आणि मोदींना कसे चालतात असा सवालही त्यांनी केला.