श्रीनगर – जम्मू काश्मिरात अतिरेकी कारवाया वाढल्या असून तेथे अनेकांच्या हत्या आता होत आहेत. त्यावरून कॉंग्रेसने मोदी सरकारला निशाण्यावर घेताना म्हटले आहे की, काश्मिरात लोकांचे रक्षण करण्यात मोदी सरकारला अपयश येत आहे. पक्षाच्या राज्यसभा सदस्य रजनी पाटील यांनी आज हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले त्यानंतर त्या पत्रकारांशी बोलत होत्या.
यावेळी त्यांच्या समवेत प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष जी. ए. मीर, पक्षाचे दुसरे नेते तारीक हमीत कर्रा हेही उपस्थित होते. काश्मिरातील अल्पसंख्य समाजावर दहशतवाद्यांचे हल्ले वाढत असून ही चिंताजनक बाब आहे. केंद्र सरकारने तेथील अल्पसंख्याकांचे रक्षण करण्यासाठी दमदार पावले उचलावीत, अशी मागणीही रजनी पाटील यांनी केली. नुकतीच काश्मिरातील एक शिक्षक दीपक चंद यांचीही दहशतवाद्यांनी हत्या केली असून त्यांच्याही घरी कॉंग्रेस नेत्यांनी भेट देऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.