बंगळुरू – केंद्र सरकारने देशातील सर्व राज्य सरकाराच्या आर्थिक स्थितीचीही वाट लावली आहे असा आरोप जेडीएस पक्षाचे नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी केला आहे.
काल जीएसटी कौन्सिलच्या बैठकीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी राज्यांना जीएसटी नुकसानभरपाई देण्यास केंद्र सरकार असमर्थ असल्याचे नमूद करीत राज्य सरकारांनी कर्ज उभारून ही नुकसानभरपाई भरून काढावी, अशी सूचना केली आहे.
कुमारस्वामी यांनी या भूमिकेवरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, केंद्राला कोणत्याच स्वरूपाच्या समस्येचा मुकाबला करता आलेला नाहीं. त्यांना आज जर जीएसटी कलेक्शनमध्ये 2 लाख 35 हजार रुपयांची तूट आली असेल तर त्यावर उपाययोजना करण्याची जबाबदारी केंद्र सरकारचीच आहे.
ही जबाबदारी राज्यांवर सोपवून केंद्र सरकार नामानिराळे राहू शकत नाही. राज्यांनी आरबीआयकडून कर्जे घ्यावीत अशी जी सूचना केंद्र सरकारने केली आहे त्यावरही कुमारस्वामी यांनी जोरदार टीका केली आहे.
जबाबदारी टाळण्याची केंद्राची ही भूमिका अत्यंत निषेधार्ह आहे असे त्यांनी म्हटले आहे. स्वतःची जबाबदारी टाळण्यापेक्षा केंद्र सरकारनेच रिझर्व्ह बॅंकेकडून कर्ज घेऊन राज्यांना नुकसानभरपाई दिली पाहिजे, अशी मागणीही कुमारस्वामी यांनी केली आहे.